राज्यभरातील पोस्ट ऑफिसेसना आलेली अवकळा लवकरच दूर होणार असून; केवळ पत्रव्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध असलेली पोस्ट ऑफिसेस आता विविध सेवा देण्यास तत्पर झाली आहेत.
मुंबई- राज्यभरातील पोस्ट ऑफिसेसना आलेली अवकळा लवकरच दूर होणार असून; केवळ पत्रव्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध असलेली पोस्ट ऑफिसेस आता विविध सेवा देण्यास तत्पर झाली आहेत. आतापर्यंत केवळ पत्रव्यवहार आणि आर्थिक सेवाच पोस्ट ऑफिसेसकडून देण्यात येत होती; मात्र यापुढे पासपोर्ट, आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्रेही पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य पोस्ट ऑफिसच्या एका अधिका-याने दिली. यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयात बदल करण्यात येत असून; यात इंटरनेट सुविधेचाही समावेश असणार आहे. यामुळे ही सेवा पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात येईल.
याचाच एक भाग म्हणून पश्चिम भागातील दोन पोस्ट कार्यालयांचे पासपोर्ट सेवा केंद्रात रूपांतर करण्यात येत असल्याची माहितीही या अधिका-याने दिली. दमण आणि सिल्वासासह देशभरातील ५६ पोस्ट कार्यालयांचे अशाच प्रकारे पासपोर्ट सेवा केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. या संदर्भातील निर्णय जानेवारी महिन्यात परराष्ट्र खात्याने घेतला होता.
या सेवेसाठी देशातील दोन पोस्ट कार्यालयांत सव्र्हर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही या अधिका-याने सांगितले. याशिवाय सरकार देशभरातील कोर्ट परिसरात पोस्टाच्या माध्यमातून बँकिंग सेवा देण्याच्याही विचारात आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात सरकारने पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून जुन्या नोटा बदलून देणे आणि डिपॉझिट घेऊन विविध सेवांची मुहूर्तमेढ रोवली होती.