मुंबईतील मतदार नोंदणीचे काम जलदगतीने सुरू असून जानेवारीपासून आत्तापर्यंत ७२ हजार मतदारांत वाढ झाली आहे.
मुंबई- मुंबईतील मतदार नोंदणीचे काम जलदगतीने सुरू असून जानेवारीपासून आत्तापर्यंत ७२ हजार मतदारांत वाढ झाली आहे. ही मतदार नोंदणी प्रभावीपणे राबवण्यासाठी बक्षीस योजना निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
ज्या गृहनिर्माण संस्था, महाविद्यालय व मतदान अधिकारी शंभर टक्के मतदार नोंदणीचे काम करतील, त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही योजना जाहीर केली आहे.
मुंबईत येत्या फेब्रुवारीत होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०१६ दरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यात गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतीतील सर्व मतदारांची नोंदणी शंभर टक्के करावी, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी संबंधित महाविद्यालयांनी करावी.
यात ज्या गृहनिर्माण संस्था तसेच महाविद्यालय शंभर टक्के मतदारांची नोंदणी करेल, अशा संस्था व महाविद्यालयांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. तसेच मतदान अधिकारी यांनाही अशाच प्रकारे गौरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ज्या मतदारांचे नाव २०१४च्या विधानसभा निवडणुकीत असेल व इमारत पुनर्विकासामुळे इमारत अथवा चाळ तथा झोपडया पाडल्या असतील अशा नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी, असेही आवाहन त्यांनी केले. मुंबईतील १.२४ कोटी लोकसंख्येच्या आधारे सरासरी ५४ हजारांचा एकप्रमाणे २२७ नगरसेवकांचे प्रभाग बनवण्यात आले आहेत. या प्रभागांच्या रचना व आरक्षण ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता वांद्रे येथील रंगशारदा नाटयगृहात जाहीर होईल.