विधिमंडळात संमत झालेल्या कायद्यांमुळे जनतेला दिलासा मिळतो; परंतु त्याचबरोबर राज्य विकासाच्या दिशेने पुढे जात असते.
मुंबई- विधिमंडळात संमत झालेल्या कायद्यांमुळे जनतेला दिलासा मिळतो; परंतु त्याचबरोबर राज्य विकासाच्या दिशेने पुढे जात असते. त्यामुळे ‘विधिमंडळ’ म्हणजे जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे सर्वोच्च व्यासपीठ असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे व्यक्त केले.
चर्चगेट येथील सरकारी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी महाराष्ट्र विधिमंडळाला अभ्यासभेट दिली. या प्रसंगी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विद्यार्थ्यांंशी संवाद साधला. संसदीय कार्यप्रणालीत विधिमंडळ कामकाजाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सभागृहाच्या मान्यतेशिवाय सरकारला एक पैसाही खर्च करता येत नाही.
जनसामान्यांचे विविध प्रश्न सन्माननीय सदस्यांद्वारे सभागृहात मांडले जाऊन सरकारकडून त्यांना न्याय प्राप्त केला जातो. सभागृहात अनेकदा वैचारिक अथवा शाब्दिक संघर्ष होत असला तरी त्यावरून सभागृहात नेहमी असेच होते असे अनुमान काढता कामा नये.
महाराष्ट्र विधिमंडळाने उत्तम कामकाजाची परंपरा निर्माण केलेली आहे. ती पाळली जायला हवी, असेही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांची उत्तरे देताना स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी अध्यादेश, हक्कभंगाची प्रक्रिया, सभागृह कामकाजाचा क्रम, प्रश्नोत्तरे, लक्षवेधी या संदर्भात विविध प्रश्न विचारून विधानसभा अध्यक्षांकडून माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर या वेळी उपस्थित होते.