विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे सुरू झाले. मिनी विधानसभा म्हणून गाजलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राच्या सत्तेत असलेले शिवसेना-भाजपा हे दोन मित्रपक्ष एकमेकांवर तुटून पडले होते.
अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप करीत होते. आज मात्र शिवसेनेचे मंत्री भाजपाच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून हसतमुखी चेह-याने पाहायला मिळत होते. तेव्हा विरोधकांकडून त्याच्या टोप्या उडविल्या जात होत्या. विरोधी बाकावरून शिवसेनेच्या मंत्र्यांना खिशातले राजीनामे आता खिशात दिसत नाहीत, अशा कोपरखळय़ा मारल्या जात होत्या. तर काही जण राजीनामे नेमके गेले कुठे असेही प्रश्न विचारत होते. त्यावर शिवसेनेचे मंत्री फक्त कसनुसं हसत होते.
विधान परिषदेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी सर्व आमदारांना लॅपटॉप देण्यात आले आहेत. शिवसेना मंत्र्यांची खिल्ली उडविताना राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर म्हणाले की, आता शिवसेनेच्या मंत्र्यांना आपले राजीनामे खिशात ठेवायची गरज नाही. ते आपला राजीनामा केव्हाही पेपरलेस पद्धतीने सभापतींकडे पाठवू शकतात. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
सभागृहात उपस्थितीत असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री दिवाकर रावते यावेळी चांगलेच खजिल झाले. तरीही विरोधकांची फिरकी घेण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. ते म्हणाले की, आमच्या राजीनाम्याचे काय व्हायचे ते होऊ द्या, परंतु आता तुम्हाला तुमची आक्रमकता दाखविण्यासाठी फाडायला पेपर मिळणार नाहीत त्याचे काय करायचे याचा विचार करा. रावते यांनी लॅपटॉप चालू केला तेव्हा त्यावर काही इंग्रजी माहिती आली. त्यांनी तत्काळ त्याबाबत आपला आक्षेप नोंदविला.
ते म्हणाले की, हे विधान भवन महाराष्ट्रात आहे, इथे सर्व माहिती मराठीतच आली पाहिजे. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले की, आता सुरुवात झाली आहे. मराठीत माहिती देण्याबरोबरच ही यंत्रणा हाताळण्याची ज्या सदस्यांना सवय नाही, त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल. त्यावर शेकापचे जयंत पाटील यांनी सूचना केली की, ज्यावेळी आम्हाला एखादा कागद पाहिजे असतो किंवा एखादी माहिती मंत्री किंवा सभापतीकडे पाठवायची असते तेव्हा आम्ही सभागृहात उभ्या असलेल्या शिपायांना बोलावून त्यांच्यामार्फत ती पाठवितो. आता ही यंत्रणा आल्यानंतर त्याची नीट ओळख सदस्यांना होईपर्यंत काही अडचण आल्या तर ती सोडविण्यासाठी सभागृहात दोन तंत्रज्ञ ठेवावेत.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच प्रथेप्रमाणे भाजपाचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभाराचा प्रस्ताव मांडला. सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्या नीलम गोऱ्हे त्याला अनुमोदन देण्यासाठी उभ्या राहिल्या. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्याला हरकत घेतली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल भाजपाचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी आभाराचा प्रस्ताव मांडला आहे, ते योग्यच आहे. परंतु शिवसेना सदस्य नीलम गोऱ्हे त्याला अनुमोदन देण्यासाठी उठत आहेत.
राज्यपालाचे अभिभाषण हे मंत्रिमंडळाकडून तयार होऊन राज्यपालांकडे पाठविले जाते. मंत्रिमंडळात त्यावर एकमत व्हावे लागते. गेले दीड-दोन महिने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून जो शिवसेना-भाजपामध्ये ‘सुसंवाद’ सुरू होता तो सर्वानी पाहिलेला आहे. या दोन महिन्यात शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याने ते मंत्रिमंडळ बैठकीला होते का, राज्यपालांच्या अभिभाषणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तेव्हा शिवसेनेचे मंत्री होते का, नसतील तर त्यात मांडलेल्या मुद्दय़ाशी शिवसेना सहमत आहे का, याचा खुलासा व्हावा. त्यावर पुन्हा सभागृहात एकच हशा पिकला.