नागपूर हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असताना मागील दीड आठवडयांपासून पहिल्यांदाच विदर्भातील विविध प्रश्नांविषयी विरोधी पक्षाने मांडलेल्या नियम २९३अन्वये प्रस्तावाच्या चर्चेवर सरकारची उदासिनता बुधवारी विधानसभेत दिसून आली.
नागपूर- नागपूर हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असताना मागील दीड आठवडयांपासून पहिल्यांदाच विदर्भातील विविध प्रश्नांविषयी विरोधी पक्षाने मांडलेल्या नियम २९३अन्वये प्रस्तावाच्या चर्चेवर सरकारची उदासिनता बुधवारी विधानसभेत दिसून आली.
सभागृहात इतक्या महत्त्वाच्या विषयावरील चर्चेला मुख्यमंत्री, विदर्भातील कार्यक्षेत्र असलेले अर्थमंत्री, नगरविकास राज्यमंत्र्यांनीच दांडी मारल्याने सभागृहात मंत्र्यांचे कोरम होऊ शकले नाही. यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विदर्भातील जलसंपदाची अपूर्ण कामे, अनुशेषांतर्गत प्रकल्प, भूसंपादन, रखडलेले प्रकल्प, सिंचन, पिण्याचे पाणी आणि शेतक-यांच्या विविध समस्याच्या संदर्भात प्रस्ताव मांडला. मात्र सभागृहात मंत्र्यांचे कोरमच नसल्याने सुरुवातीला पाच आणि नंतर दहा मिनिटांसाठी व शेवटी याविषयीचे कामकाज पुढील दिवसांवर ढकलण्याची वेळ सरकारवर आली.
विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात प्रस्ताव मांडताच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहात कोरम नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विदर्भाच्या प्रश्नावर सभागृहाच्या बाहेर पोकळ भाषण देणारे मुख्यमंत्री, अर्थमंत्री सभागृहात विषय आल्यास त्यावर विरोधी पक्षनेते काय म्हणणार आहेत, याविषयाचे प्रश्न ऐकून घेण्याची इच्छा दाखवत नाहीत.
तसेच एक सौजन्य म्हणून तरी विदर्भाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचे भाषण सुूरू असताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बसणे आवश्यक असताना तेही आले नाहीत आणि ज्या विषयावर प्रस्ताव मांडण्यात आला त्याचे मंत्रीही उपस्थित नसल्याने जयंत पाटील यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपण उपस्थित असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर जयंत पाटील यांनी पुन्हा आक्षेप घेत तुमचे कोरम कुठे आहे, असा सवाल करून हे सभागृह कोरम नसल्याने तहकूब करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
त्यानंतर सभागृह सुरू झाले त्यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रणजीत पाटील, राज्यमंत्री वायकर आणि आत्राम हे धावत आले. मात्र तेव्हाही कोरम पूर्ण होत नसल्याचे विरोधकांनी दाखवून दिल्याने पुन्हा दहा मिनिटांसाठी आणि नंतर विदर्भाच्या प्रश्नावर सरकारचे कोरमच नसल्याने याविषयीच्या प्रस्तावावरील चर्चा पुढील दिवशी ढकल्याची नामुष्की सरकारवर ओढवली.