उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएचे गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी एनडीएचे व्यंकय्या नायडू यांची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
नवी दिल्ली- भाजपाने केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केले आहे. भाजपाच्या संसदीय समितीने सोमवारी हा निर्णय घेतला. भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी व्यंकय्या नायडूंच्या नावाची घोषणा केली. नायडू उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे शहा यांनी सांगितले.
काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएनेही उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी नायडू यांची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
व्यंकय्या नायडू हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी सरकारमध्ये नायडूंकडे नगरविकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी २००२ ते २००४ या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नायडूंकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिले जाते. नायडूंना २५ वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे.
गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू असून ते निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपालपद (२००४ ते २००९) भूषवलेले आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे. पुढील महिन्यात ५ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.