आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणा-या मुलाला यमसदनी धाडण्यासाठी आई व भावाने ५० हजारांची सुपारी देण्याचा प्रकार उघडकीस आला असून वालीव पोलिसांनी या हत्येचं गूढ उकलल असून ४ जणांना अटक केली आहे.
नालासोपारा- आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणा-या मुलाला यमसदनी धाडण्यासाठी आई व भावाने ५० हजारांची सुपारी देण्याचा प्रकार उघडकीस आला असून वालीव पोलिसांनी या हत्येचं गूढ उकलल असून ४ जणांना अटक केली आहे. नशा आणि पैशाच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नात्यातील आदर नातेसंबंध लयाला गेला आहे. गेल्या आठवडय़ात विरारमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला अडीच लाखांची सुपारी देऊन यमसदनी धाडले या प्रकरणी विरार पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.
दिवसेंदिवस आई – मुलगा,भाऊ – भाऊ, भाऊ – बहीण पति-पत्नी, पत्नी – पती एकमेकांना सुपारी देऊन मारण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. नात्यातील पावित्र्य नष्ट होत चालले आहे. अशाच एका घटनेत मुलाच्या दुष्कृत्याला वैतागून आपल्याच पोटच्या गोळ्याची सुपारी देऊन हत्या केली आहे. २१ ऑगस्ट १७ रोजी जानकीपाडा खदानीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. २५ दिवसांनंतर वालीव पोलिसांनी या हत्येचा छडा लावण्यात यश मिळवले आहे.
२१ ऑगस्ट १७ रोजी दुपारी जानकी पाडा येथे एका अज्ञात युवकाचा गळा चिरून हत्या केलेला मृतदेह सापडला होता. वालीव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करत होते. मृताची ओळख पटवण्यासाठी वालीव पोलिसांनी पालघर जिल्हा, ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर परिसरात पोस्टर लावले होते. सोशल मिडियावर फोटो व्हायरल केले होते. अखेर २५ दिवसांनंतर समजले की तो युवक भाईंदर पश्चिमेकडील गणेश देवलनगरमध्ये राहणारा रामचरण रामदास द्विवेदी (२१) आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. व्ही. बांदेकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक माने, सचिन चव्हाण यांच्या पथकाने मयताच्या आईची चौकशी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार मयत रामचरण रामदास द्विवेदी हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याला नात्याचा विसर पडला होता. त्याने अनेक महिलांवर अत्याचार केले होते. याच कारणावरून कंटाळून आई रजनी, भाऊ सीताराम याने त्याच्या हत्येचा कट रचला आणि वसई पूर्वेकडील जानकीपाडा येथे राहणारे केशव मिस्त्री व राकेश यादव यांना ५० हजार रुपयांची सुपारी दिली. २१ ऑगस्ट १७ रोजी आई, भाऊ, केशव मिस्त्री व राकेश यादवने त्याला फूस लावून भाईंदरहून एका टेम्पोत बसवून वसईला घेऊन आले आणि रात्री २ च्या सुमारास केशव व यादवने त्याला टेम्पोतून खाली उतरले आणि कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून हत्या केली.
[EPSB]