मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर येथील वातावरणातील उकाडा चांगलाच वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वारे, वाढती आद्र्रता यामुळे मुंबईतील वातावरण अत्यंत उष्ण झाले आहे.
मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर येथील वातावरणातील उकाडा चांगलाच वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वारे, वाढती आद्र्रता यामुळे मुंबईतील वातावरण अत्यंत उष्ण झाले आहे. ऑक्टोबरपूर्वीच आलेल्या या उकाडय़ामुळे वेगवेगळय़ा आजारांच्या साथी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३३.४, ३३.५ एवढय़ा कमाल तापमानाची नोंद झाली आहे. येथील आद्र्रताही नव्वद टक्क्यांच्या आसपास पोहोचली असून, वाढती आद्र्रता मुंबईकरांना घामाघूम करीत आहे.
शहरातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. पृथ्वीचे तापमानही वाढत आहे. पृथ्वीचे तापमान दरवर्षी ०.२० अंश सेल्सिअसने वाढत आहे. पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्यानंतर मानवजात नष्ट होण्यास सुरुवात होईल. एकीकडे आपण पर्यावरणाची हानी करीत आहोत आणि दुसरीकडे प्रदूषण वाढवत आहोत. त्यामुळे दुप्पट गतीने आपण विनाशाकडे जात आहोत. मार्च २०१५ मध्ये झालेल्या जागतिक पॅरिस करारात स्पष्ट सांगितले आहे की, पृथ्वीचे सरासरी तापमान १७५० सालच्या तुलनेने अजून दोन अंशांनी वाढले तर मानवजात नष्ट होणे अटळ आहे. तरीही लोक इतके गाफील का, असा सवाल पर्यावण तज्ज्ञ विचारीत आहेत.
वातावरणीय बदलांमुळे त्वचाविकार आणि अन्य आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. जर सतत फिरत असाल तर शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. त्याशिवाय, उलटय़ा, जुलाब, व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाचे विकार, अति उन्हामुळे ‘हीट स्ट्रोक’ होऊ शकतात. त्यामुळे, लोकांनी सोबत पाणी ठेवले पाहिजे. बाहेरची थंड पेये टाळावीत, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत. वाढत्या उन्हाचा त्रास शरीरासह त्वचेवरही होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे फंगस इन्फेक्शन होऊन शरीरावर लाल चट्टे उठू शकतात किंवा नायटा उठू शकतो. त्यामुळे उन्हात जास्त घट्ट कपडे टाळले पाहिजेत. डोक्यावर छत्री धरत, रुमाल बांधून, तोंडाला स्कार्फ लावून घरातून बाहेर पडणा-या मुंबईकरांना डॉक्टरांनी आहार आणि पोशाखाच्या बाबतीत काळजी घेण्याचे सुचविले आहे.
घामाने त्रस्त असणा-या रुग्णांमध्ये वाढ
घामाने शरीराला खाज सुटणे, अतिघाम येणे, त्वचेवर चट्टे उठणे अशा प्रकारच्या तक्रारींचा सूर घेऊन येणा-या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या वातावरणीय बदलांमुळे होणा-या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे, नायटाचे संसर्ग झालेल्या रुग्णांमध्येही दिवसागणिक वाढ होताना दिसत असल्याचे वैद्यकीय अधिका-यांचे मत आहे.
[EPSB]
लोकसभा आणि विधानसभा दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या असतानाच राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
[/EPSB]