शाळेतील मुलांनी हजेरी देताना यस सर किंवा यस मॅडमऐवजी जय हिंद म्हणावे, असा नवा आदेश मध्य प्रदेश सरकारने काढला आहे. सरकारचा हा नवा आदेश वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
भोपाळ- शाळेतील मुलांनी हजेरी देताना यस सर किंवा यस मॅडमऐवजी जय हिंद म्हणावे, असा नवा आदेश मध्य प्रदेश सरकारने काढला आहे. सरकारचा हा नवा आदेश वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे. सुरुवातीला काळात सतना जिल्ह्यात हा आदेश लागू होईल. यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शाळांमध्येही या आदेशाचे पालन केले जाईल. मध्य प्रदेश सरकामधील शिक्षण मंत्री कुंवर विजय शाह यांनी हा आदेश काढला आहे.
हजेरीवेळी यस मॅडम, यस सर बोलण्याऐवजी जय हिंद बोलण्याचा प्रयोग सतनामध्ये करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या परवानगीने संपूर्ण राज्यात याबद्दलचा आदेश लागू केला जाईल. सतनामधील खासगी शाळांमध्ये या आदेशाची जबरदस्तीने अंमलबजावणी केली जाणार नाही. मात्र, हा आदेश देशभक्तीशी संबंधित असल्याने खासगी शाळादेखील त्याची अंमलबजावणी करतील, अशी आशा आहे, असे विजय शाह यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी नवा आदेश लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र मध्य प्रदेशमध्ये लवकरच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आल्याची चर्चा मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. अद्याप यावर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद शमवण्यासाठी ‘वंदे मातरम् म्हणणे हा वैयक्तिक मुद्दा असल्याचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले होते. ज्यांना वंदे मातरम म्हणायचे नाही, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले होते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या राष्ट्रगीताला कोणी जाणूनबुजून विरोध करत असल्यास ते अयोग्य आहे. अशा लोकांची कृती देशविरोधी आहे, असेही नक्वी म्हणाले होते.
[EPSB]
[/EPSB]