‘हात दाखवणे’ या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. निरोपाचा हात दाखविला जातो, जरब बसविण्यासाठी हात दाखवला जातो आणि हात दाखवून अवलक्षणही करून घेतले जाते. परिस्थितीसापेक्ष त्याचा अर्थ घ्यायचा असतो.
‘हात दाखवणे’ या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. निरोपाचा हात दाखविला जातो, जरब बसविण्यासाठी हात दाखवला जातो आणि हात दाखवून अवलक्षणही करून घेतले जाते. परिस्थितीसापेक्ष त्याचा अर्थ घ्यायचा असतो. हाताचा पंजा हे काँग्रेस पक्षाचे सध्याचे निवडणूक चिन्ह आहे. यापूर्वी १९५१ मध्ये देशात काँग्रेस हा मोठा आणि मजबूत पक्ष होता. त्यावेळी जोखड असलेली बैलजोडी हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह होते. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखी मातब्बर मंडळी काँग्रेसमधून देशाचा सशक्त कारभार चालविण्यासाठी सक्षम होती.
मात्र प्रातिनिधिक स्वरूपात चिन्ह तयार करताना समांतर चालणा-या त्यांच्यापैकी कोणाही दोघांना अभिप्रेत धरून बैलजोडीचे चिन्ह तयार करण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या रूपाने देशाला एक कणखर पंतप्रधान मिळाला. नेहरूंच्या हयातीतच इंदिरा गांधी त्यांचा राजकारणाचा वारसा चालवीत होत्या. १९६७ मध्ये त्या पंतप्रधान झाल्यानंतर १९६९ मध्ये काँग्रेस पक्षाची निशाणी बदलण्यात आली. जोखडधारी बैलजोडीच्या ऐवजी गाय-वासरू हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह वापरण्यात आले.
बैलजोडी असो वा गाय-वासरू दोन्ही चिन्ह शेतीप्रधान भारत देशाचे प्रातिनिधिक चिन्ह ठरलेच, पण वारसा हक्काने राजकारणात प्रवेश करू पाहणा-या संजय गांधी यांच्यासाठीही ते चिन्ह उपयुक्त ठरले. गाय-वासरू म्हणजे मायलेकराचे नाते. पंतप्रधान इंदिरा गांधी माय, तर संजय गांधी लेकरू. मात्र १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि त्या चिन्हाविषयी चेष्टा सुरू झाली. त्यामुळे १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी निवडणूक चिन्ह बदलायचे ठरविले आणि हाताचा पंजा हे चिन्ह स्वीकारले. हे चिन्ह सर्वसामान्यांचे चिन्ह ठरले. सहज जाता-येता हात दाखवला तरी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाची जाहिरात होत होती. त्याचा उपयोग १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसला चांगला झाला.
इंदिरा गांधींबरोबर संयज गांधी लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर काही वर्षानी संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि पुढे १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. येथेच गांधी घराण्याचा राजकारणातला अस्त होतो की काय, असे वाटत होते. पण राजकारणाशी संबंध नसलेले राजीव गांधी घराण्याचा वारसा चालविण्यासाठी पुढे आले आणि देशवासीयांनी त्यांना स्वीकारले सुद्धा. २ डिसेंबर १९८९ पर्यंत राजीव गांधी पंतप्रधान होते. पुढे ते विरोधी पक्षनेते असताना २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील पेरुम्बुदुर येथे त्यांची हत्या झाली. त्यानंतर साहजिकच घराण्याचा वारसा हक्क म्हणून राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
राजकारणाचे बाळकडू न प्यालेल्या आणि राजकारणाशी फारसा संबंध नसलेल्या व्यक्ती एखाद्या पक्षाची धुरा वाहतात तेव्हा नवख्या सुकाणूप्रमाणे नाव जशी सागरात हेलखावे खाऊ लागते, तशी काँग्रेसची नाव राजकारणाच्या सागरात हेलखावे खाऊ लागली. मात्र काँग्रेसवरची पकड सोडायला गांधी घराणे आजही तयार नाही. सोनी यांच्या काळात काँग्रेसचा ऱ्हास सुरू झाल्यानंतर गांधी घराण्याचे प्रियंका गांधी-वडेरा आणि राहुल गांधी यांच्याकडे वारस म्हणून पाहण्यात येऊ लागले. इंदिरा गांधी यांच्या चेह-याशी साम्य असलेल्या प्रियंका गांधी यांचा राजकारणात उपयोग करू घ्यायचा काँग्रेसच्या धुरिणांचा मानस होता. मात्र प्रियंका यांनी तशी तयारी दाखवली नाही. त्यामुळे सोनियांना उत्तराधिकारी आणि गांधी घराण्याचे वारस म्हणून राहुल गांधी यांच्याकडेच पाहिले जात आहे. आजच्या घडीला सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राहुल गांधी उपाध्यक्ष आहेत. मात्र कारभार राहुल गांधीच पाहत आहेत. राजकारणाचा अनुभव नसलेल्या या दोघांच्या काळात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी सत्तापरिवर्तनासाठी चौखुर उधळलेला घोडा थांबविण्याची काँग्रेसमध्ये ताकद राहिली नव्हती. त्यामुळे भाजपचा स्पष्ट विजय झाला. काँग्रेस भुईसपाट झाल्याने डोके फिरल्याप्रमाणे राहुल गांधी असंबद्ध भाषणे ठोकत राहिले. त्याने काँग्रेसची प्रतिमा अधिकच खालावत गेली. लोक राहुल गांधी यांची चेष्टा करू लागले. तरीही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडू नये हे गांधी घराण्याचे आणि काँग्रेसचे दुर्दैवच म्हणायला हवे. हे कमी की काय, म्हणून त्यांनी कॅलिफोर्नियात केलेल्या भाषणात मोदी किती चांगले आहेत आणि आपण किती कच्चे लिंबू आहोत हेच दाखवून दिले.
विरोधी पक्षनेत्याने विरोधासाठी विरोध करायचा नसला तरी स्वत:च्या पक्षाची ध्येयधोरणे देशवासीयांसमोर आणि जगासमोर मांडायची असतात. पण २०१९ च्या निवडणुकीत सत्ता काबिज करायला निघालेल्या आणि पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहणा-या राहुल गांधी यांना आपण काय बोलतो आहोत याचेही भान राहिले नाही. एकीकडे मोदींचे गुणगान, मध्येच भाजपच्या ध्येयधोरणांवर टीका आणि शेवटी आपल्या घराणेशाहीची कबुली देतानाच भाजप आपल्याला कसे कोंडीत पकडू पाहत आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. त्यांच्या भाषणावरून भाजपने टिंगलटवाळी केलीच, शिवाय देशवासींयाच्याही चेष्टेचे शिकार ठरले. राहुल यांचे भाषण म्हणजे भाजपसाठी पोषक वातावरण आहे. अगोदर हात दाखवून अवलक्षण करून घेतलेच आहेच, आता असंबद्ध बडबड करून तोंड फोडून घेत आहेत.
[EPSB]
पंतप्रधान मोदी हे माझ्यापेक्षा अधिक चांगले वक्ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ते आहेत. ते माझेही पंतप्रधान आहेत, त्यांच्यात अनेक चांगले गुण आहेत. ते शानदार वक्ते आहेत. त्यांची संवादशैली माझ्यापेक्षा उत्तम आहे. गर्दीत तीन-चार समूहांना काय संदेश द्यायचा, हे त्यांना चांगले माहीत आहे.
[/EPSB]