पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सहृदयी अमित शहा आणि तब्बल २५ केंद्रीय मंत्र्यांना साथीला घेऊन साम, दाम, दंड या नीतीचा वापर करीत उत्तर प्रदेशची सत्ता काबीज केल्यानंतर आपला, अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा चेहरा योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने पुढे आणला आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले अजयसिंह बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ १९९८पासूनच यूपीच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी २००२मध्ये हिंदू धर्म प्रसारासाठी युवा वाहिनीची सुरुवात केली होती. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशसह भारत हिंदुराष्ट्र केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केली. नेहमी भगवी वस्त्रे परिधान करणारे आदित्यनाथ यांची पूर्व उत्तर प्रदेशात मोठी ताकद आहे.
गोरखपूर येथील गोरखपीठ हे त्यांचे शक्तिस्थळ. त्यांचे वडील महंत अवैद्यनाथ यांच्या निधनानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांच्याकडे या पीठाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आली. राजपूत कुटुंबातील योगींनी उत्तराखंडमधून विज्ञान शाखेची पदवी घेतली आहे. २००२ मध्ये त्यांनी हिंदू वाहिनीची स्थापना केली. ५ जून १९७२ रोजी जन्मलेले आदित्यनाथ केवळ २६व्या वर्षी प्रथम खासदार झाले. बाराव्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य ते होते. गोरखपूरमधून १९९८, १९९९, २००४, २००९ व २०१४ मध्ये सलग ते विजयी झाले.
खा. असदुद्दीन ओवैसी म्हणतात त्यानुसार, नरेंद्र मोदींच्या न्यू इंडिया मिशननुसारच योगी आदित्यनाथ यांची निवड झाली आहे, असे म्हणण्यास आता वाव मिळाला आहे. गोरखपूर दंगलीनंतर याच योगींनी पोलीस दलातील सर्वोच्च अधिका-याची बदली करण्यास खुद्द मुलायमसिंग यादव यांना भाग पाडले होते. आता तर राज्य त्यांच्या ताब्यात आले आहे. २०१६ मध्ये एका राष्ट्रीय अहवालानुसार भाजपाची सत्ता आल्यानंतर देशात दलित, मागासवर्गीय आणि मुस्लीम समाजावरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. यात उत्तर प्रदेशातील घटनांची संख्या सर्वाधिक आहे.
उत्तर प्रदेशात भाजपा सत्तेत आले, तर पहिल्यांदा राम मंदिर बांधू तसेच गत १४ वर्षातील भ्रष्टाचाराची चौकशी करू, अशी आश्वासने देणारे योगी आदित्यनाथ हे प्रत्यक्षपणे प्रचाराच्या पहिल्या चरणापासूनच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मोदींनी एकीकडे वेळोवेळी स्थानिक प्रतिनिधींना संधी द्या, ते नवखे असले तरी त्यांना माझ्यासाठी म्हणून संधी द्या, असे भावनिक आवाहन करीत सत्ता मिळवली. मात्र सत्ता काबीज करताच त्यांनी हिंदू धर्म प्रसारकांना सत्ताकेंद्री ठेवले आहे. हा एक प्रकारचे संघाचाच अजेंडा मोदींनी सर्व ठिकाणी राबविण्यास सुरुवात केल्याचे दिसते.
गोव्यातही त्यांनी आधीपासूनच पर्रिकरांना माघारीचे संकेत दिले होते. म्हणून ढवळीकरांनी आहे मनोहर तरच सुदिन, असे म्हणताच केंद्रातल्या संरक्षण मंत्रीपदाचा त्याग करून पर्रिकरांनी घरवापसी केली. उत्तर प्रदेशातही मोदींनी राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर केली होती, मात्र मी आहे तिथे सुखी आहे, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी दिल्लीत राहणेच पसंत केले. या शिवाय कट्टर भाजपा विचाराचे केशवप्रसाद मौर्य आणि ब्राह्मण चेहरा या कारणाने बलराज मिश्र आदींची नवे चर्चेत राहिली, पण मोदी आणि शहा यांनी जे ठरविले तेच झाले आणि योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे भाजपाने आपले हिंदुत्ववादाचे मूळचे मुद्दे सोडलेले नाहीत, असाच संदेश या निमित्ताने दिला आहे. घरवापसी, लव्ह जिहाद, गोरक्षा अशा वादग्रस्त मुद्दय़ांमुळे नेहमीच चर्चेत ठरलेले योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी नेमणूक करणे भाजपाच्या दृष्टीने आवश्यक बनले होते. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मोठा जनाधार असून उत्तर प्रदेशातील भाजपाचे आजचे ते सर्वात मोठे नेते आहेत.
विज्ञान विषयातील पदवीधर ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठय़ा राज्याची धुरा योगी आदित्यनाथ यांच्याकडे आल्याने आता भाजपाच्या हिंदुत्वाच्या धोरणाला अधिक बळ मिळणार अशी चिन्हे आहेत. सूर्यनमस्काराची सक्ती, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीम व्यक्तीस अमेरिकेतील प्रवेशास बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाला सर्वात पहिल्यांदा पाठिंबा देणारे योगी आदित्यनाथ यांनी भारतातही असाच निर्णय व्हायला हवा, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.
कदाचित केंद्रीय मंत्र्यांना राज्यात परत आणताना भाजपाने कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना संधी देत धर्म प्रसारास प्रोत्साहन दिले आहे. धर्मप्रसाराचे काम करतानाच संघाचा अजेंडा छुप्या मार्गाने राबविण्याचा मोदींचा प्रयत्न यातून दिसून येतो. योगी आदित्यनाथ यांच्या निवडीची दखल पाकिस्तानातील ‘डॉन’ या आघाडीच्या दैनिकाने घेतली आहे, ती कौतुक म्हणून नव्हे, तर कट्टर हिंदुत्ववादी आणि मुस्लीमविरोधी नेता म्हणून योगी अधिक प्रसिद्ध आहेत त्यामुळे. देशातील सर्वाधिक मतदारसंघ आणि सर्वात मोठे राज्य आणि सर्वाधिक दलित, मुस्लीमबहुल असणा-या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ विराजमान होणे हे सर्वधर्मसमभाव मानणा-या लोकशाही देशाला काही विपरीत परिणाम देणारे ठरू शकते याचेच हे संकेत ठरावेत, अशा प्रतिक्रिया सर्वच थरातून येत आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी आजअखेर १८०० लोकांची घरवापसी केली आहे. भाजपाकडून योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून करण्यात आल्यानंतर लगेचच त्यांनी उत्सवी उन्मादावर भाष्य केले होते. बरेलीमध्ये एका समुदायाने धार्मिक स्थळावर झेंडे फडकावत घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर उत्सवांच्या नावाखाली केला जाणारा उन्माद सहन केला जाणार नाही, असा इशाराच योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशात तोंडी तलाकचा मुद्दा प्रचारकाळात महत्त्वाचा मानला होता. आता मोदी सरकार या पद्धतीवर कायद्याने काय भूमिका घेते आणि उत्तर प्रदेशातील मुस्लीम आणि दलितांकरिता खरेच काही भरीव विकासकाम करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.