ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी आणि अंतिम वनडे रविवारी (१ ऑक्टोबर) विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) जामठा स्टेडियमवर खेळली जात आहे.
नागपूर- ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी आणि अंतिम वनडे रविवारी (१ ऑक्टोबर) विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) जामठा स्टेडियमवर खेळली जात आहे. या लढतीद्वारे मध्यमगती गोलंदाज उमेश यादवला घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यास त्याचे कुटुंबीय आणि चाहते उत्सुक आहे. विदर्भने तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलेत. त्यात प्रशांत वैद्यसह उमेश यादव आणि फैझ फझलचा समावेश आहे. या तिघांमध्ये केवळ उमेशची कारकीर्द लक्षात राहणारी आहे. त्याने १० वर्षात ३४ कसोटी, ७१ वनडे आणि एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहे.
मात्र या कालावधीत यादवला नागपूरमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. २०१३मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचा समावेश होता. मात्र दुखापतग्रस्त असल्याने नागपूर वनडेला तो मुकला. दोन वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ नागपूरमध्ये कसोटी सामना खेळला. त्यावेळी उमेशच्या सहभागाबाबत विचारले असता, ‘‘आमच्यासाठी टीम काँबिनेशन महत्त्वाची आहे. घरच्या मैदानावर यादवला खेळवावे, असे आम्हाला वाटत नाही. टीम काँबिनेशनमध्ये सामावणारा क्रिकेटपटू अंतिम संघात खेळेल,’’ असे उत्तर कर्णधार विराट कोहलीने दिले होते.
गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या ठिकाणांमध्ये नागपूरचा समावेश होता. मात्र त्या वर्ल्डकप संघात उमेशला स्थान मिळाले नव्हते. ‘‘उमेशला ‘होमग्राउंड’ खेळताना पाहण्याचे आमचे स्वप्न आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीमध्ये आमचे स्वप्न पूर्ण होईल, असे वाटते. मात्र उमेश खेळावा आणि भारत जिंकावा, असे आम्हाला वाटते,’’ असे उमेशची पत्नी तान्याने सांगितले. पत्नी तान्यासह उमेशचा भाऊ रमेश, सहकारी शैलेश ठाकरे तसेच हजारो चाहत्यांची तशीच प्रतिक्रिया आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन वनडेसाठीच्या भारताच्या संघात उमेशचा समावेश करण्यात आला. वेस्ट इंडिज दौ-यानंतर म्हणजे तीन महिन्यांनी पुनरागमन करणा-या उमेशला चौथ्या वनडेत फलंदाजीला अनुकूल बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याला धावा रोखण्यात अपयश आले. मात्र ४ विकेट घेत छाप पाडली. त्यामुळे पाचव्या वनडेतही यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास उमेशचे घरच्या मैदानावर खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
[EPSB]
भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनसह डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा, आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि सलामीवीर मुरली विजय हे कसोटीपटू रणजी करंडक स्पर्धेच्या २०१७-१८ हंगामासाठीच्या पहिल्या फेरीत खेळण्याची दाट शक्यता आहे.
[/EPSB]