अश्विन, जडेजाला विश्रांती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडेसाठी भारतीय संघाची घोषणा
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांसाठीच्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय १५ सदस्यीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. मध्यमगती दुकली उमेश यादव आणि मोहम्मद शामीचे पुनरागमन झाले. श्रीलंका दौ-यातील संघ कायम ठेवण्यात आला असून केवळ मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरला वगळण्यात आले आहे. बोर्डाच्या रोटेशन पद्धतीनुसार, दोन्ही सीनियर्सना विश्रांती दिल्याचे राष्ट्रीय निवडसमिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी संघनिवडीनंतर सांगितले.
श्रीलंकेविरुद्धच्या झटपट मालिकेप्रमाणे अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. अश्विन सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. वुर्सेस्टरशायरसोबतचा त्याचा करार चार सामन्यांचा आहे. हे सामने १२ ते १५ सप्टेंबर रोजी लीसेस्टरशायरविरुद्ध आणि २५ ते २८ सप्टेंबरदरम्या डरहॅमविरुद्ध आहे. त्यामुळे या महिन्यात अश्विन उपलब्ध होऊ शकत नाही. पुढील वर्षी असलेला इंग्लंडचा मोठा दौरा पाहता अश्विनला कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिली आहे. पुढील वर्षीचा दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंड दौरा पाहता जडेजालाही विश्रांती दिली जात आहे. २०१९ वनडे वर्ल्डकप पाहता बीसीसीआयने वनडे मालिकांमध्ये नवोदित आणि प्रतिभावंत क्रिकेटपटूंना संधी देण्याचे ठरवले आहे. श्रीलंकेत तेच पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतरची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत हेच पाहायला मिळेल. श्रीलंकेत अपयशी ठरलेल्या केदार जाधवला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळण्याबाबत साशंकता होती. मात्र वेस्ट इंडिज दौरा, आयसीसी चँपियन्स ट्रॉफी तसेच मायदेशातील मागील मालिकांमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला संधी मिळाली. पार्टटाईम फिरकीपटू आणि यष्टिरक्षक म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो.
श्रीलंका दौ-यातील चमकदार कामगिरीमुळे डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहलसह चायनामन स्पिनर कुलदीप यादव आदी क्रिकेटपटूंना संधी दिल्याचे प्रसाद यांनी पुढे म्हटले. यादव, चहल आणि पटेल या फिरकी त्रिकुटाने श्रीलंकेविरुद्ध अश्विन आणि जडेजाची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. या त्रिकुटाने १४ विकेट घेत सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी या सीनियर्सचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला १७ सप्टेंबरपासून चेन्नईत सुरुवात होईल. त्यानंतर दुसरी वनडे २१ सप्टेंबरला कोलकाता तसेच तिसरी वनडे २४ सप्टेंबरला इंदूरमध्ये होईल.
भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शामी.