‘तुम्ही महापालिकेची सत्ता भोगा, आम्हाला राज्याची सत्ता भोगायला मदत करा’ या तडजोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दहा मंत्र्यांच्या राजीनाम्याचे वांद्रे येथील खाडीत समांरभपूर्वक विसर्जन करण्यात आले.
मुंबई- ‘तुम्ही महापालिकेची सत्ता भोगा, आम्हाला राज्याची सत्ता भोगायला मदत करा’ या तडजोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दहा मंत्र्यांच्या राजीनाम्याचे वांद्रे येथील खाडीत समांरभपूर्वक विसर्जन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषित करून टाकले की, माझ्या सरकारला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तर, शिवसेनेच्या वतीने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राजीनामा खिशात ठेवलेला नाही, असेही जाहीर करून टाकले.
मुंबई महानगरपालिकेची सत्ता सेनेला देऊन मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची टिकवली आणि भाजपाचे सरकार वाचवले अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. हे दोन्ही पक्ष आणि या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ७ फेब्रुवारीपासून एकमेकांच्या विरोधात आरोप- प्रत्यारोपाचे पंधरा अंकी नाटक पंधरा दिवस तब्बल चालवले.
त्या नाटकामुळे करमणूक झाली. पण दोघेही सत्ता सोडणार नव्हते आणि शेवटी मोठ्ठा भाऊ आणि लहान भाऊ असा वाद न करता ‘आपण दोघे भाऊ-दोघे मिळून खाऊ’ या तडजोडीवर दोघांनी या नाटकाचा सुखांत शेवट केला असून आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला लोकायुक्तही महाराष्ट्राकरिता करा अशी मागणी सेनेने केली असली तरी, आता या मागण्यांना काही अर्थ राहिलेला नाही. दोघे आतून एक होते, भांडणाची नौटंकी लोकांना मूर्ख बनविण्यासाठी होती, असे आता उघडपणे बोलले जात आहे.