केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न चालवला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील भाडेवाढीचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेकडून केंद्राच्याच इशा-यावर केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.
मुंबई- केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न चालवला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील भाडेवाढीचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेकडून केंद्राच्याच इशा-यावर केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला केंद्राकडून मान्यता मिळाल्यास मुंबईतील लोकलचा प्रवास मोठय़ा प्रमाणात महागणार आहे.
पश्चिम रेल्वेला १,४०० कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट व पासामध्ये दरवाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. या प्रस्तावामुळे उपनगरीय रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या तिकीट दरात ४७ टक्क्यांनी तर द्वितीय वर्गाच्या तिकीट दरात ३८ टक्क्यांनी भाडेवाढ होऊ शकते. सध्या किमान तिकिटाची ९ किमीची मर्यादा ५ किमीवर आणण्याचा प्रस्ताव आहे.
रेल्वेच्या ०-९ किमीसाठी ५ रुपये तिकीट आकारण्यात येत आहे. सीएसटी ते दादर (९ किमी) अंतरासाठी ५ रुपये, तर चर्चगेट दादरसाठी (१० किमी) १० रुपये तिकीट आहे. सीएसटी-विलेपार्लेसाठी (हार्बरमार्गे १८ किमी) १० रुपये, तर चर्चगेट-विलेपार्लेसाठी १५ रुपये तिकीट आहे. ही तिकीट दरात असलेली विसंगती दूर करण्यासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे.