ठाणे महापालिकेच्या मंगळवारी पार पडलेल्या महासभेत टीएमटी बसेसबाबतचे ठेकेदाराने दिलेले दर जास्त असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला होता.
ठाणे- ठाणे महापालिकेच्या मंगळवारी पार पडलेल्या महासभेत टीएमटी बसेसबाबतचे ठेकेदाराने दिलेले दर जास्त असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला होता. याबाबत चर्चेसाठी वेळ मागूनही देण्यात आला नव्हता, तसेच त्यानंतर वेळेअभावी सभा तहकूब करण्यात आली होती.
यानंतर मंगळवारी पुन्हा सुरू झालेल्या महासभेतही तोच प्रकार घडला असून महापौरांनी विरोधी पक्षांना बोलण्याची संधी न देता थेट राष्ट्रगीत सुरू केल्याने हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला आहे. याबाबत आता थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार असल्याचे नगरसेवक मुल्ला यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले आहे.
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत जेएनएनयुआरएम योजनेतून खरेदी केलेल्या १९० नव्या बस दाखल होत असून या बस ठेकेदाराला चालवण्यास देण्यात येणार आहेत. यासाठी टीएमटी ठेकेदाराला ४०० एमएम सेमी लोअरफ्लोअर बससाठी प्रति कि.मी. ६६ रुपये आणि ९०० एमएम बससाठी ५३ रुपये देणार आहे.
मात्र नवी मुंबई पालिकेतील ठेकेदारापेक्षा ठाणे पालिकेच्या ठेकेददाराचे दर जास्त असल्याचा आरोप करत याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी महासभेत आल्यानंतर त्याला राष्ट्रवादीने विरोध केला होता. याप्रकरणी चर्चेसाठी वेळ मागूनही सभा तहकूब करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला होता. यानंतर मंगळवारी पुन्हा सुरू झालेल्या सभेतही शुक्रवारचीच पुनरावृत्ती झाली.
राष्ट्रवादीला चर्चेसाठी ५ मिनीटांचा वेळ देण्यात आला, मात्र त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवकांनीही वेळ मागितल्याने महापौरांनी सभा आटोपती घेत थेट राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. यामुळे ही सत्ताधारी नगरसेवकांनी वेळ मागणे आणि मग सभा तहकूब करणे ही विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधा-यांची ‘ठरलेली शाळा’ नव्हती ना? अशी चर्चा पालिकेत सुरू आहे.
निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दर वाढवले?
या प्रकाराबाबत परिवहन सेवेचे व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी महासभेत खुलासा केला. नवीन बस घेताना त्या चालवण्यास देण्यासाठी निविदा काढण्यात आली, तिला प्रतिसाद न मिळाल्याने ३ वेळा मुदत वाढवली.
मात्र तरीही प्रतिसाद न मिळाल्याने अटी आणि शर्थीमध्ये बदल करुन नव्याने निविदा काढल्याचे ते म्हणाले. यानंतर २ ठेकेदारांनी निविदा भरल्या आणि प्रक्रिया पार पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.