मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणेदरम्यानच्या स्लो मार्गावरील मेगाब्लॉकने रविवारी पुन्हा एकदा ‘मरे’चा कणा मोडल्याचे पाहायला मिळाले.
ठाणे- मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणेदरम्यानच्या स्लो मार्गावरील मेगाब्लॉकने रविवारी पुन्हा एकदा ‘मरे’चा कणा मोडल्याचे पाहायला मिळाले. या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते ठाणे हे अवघे १९ मिनीटांचे अंतर कापण्यास तीन तासांपेक्षाही जास्त वेळ लागला. यामुळे प्रवाशांच्या संयमाची पुन्हा एकदा कसोटी लागली.
कळव्याजवळील खारेगाव फाटक येथे उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी रविवारी अप आणि डाऊन स्लो मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परिणामी सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.२३ पर्यंत सर्व ठाणे ते दिव्यादरम्यान सर्व स्लो लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या. मात्र त्याचे नियोजन चुकल्याने कल्याणहून ठाण्याच्या दिशेने जाणा-या फास्ट आणि स्लो लोकलच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला.
दुपारी २ वाजता कल्याणहून निघालेल्या सीएसटी स्लो लोकलने तर विक्रमी उशीर करत तब्बल पावणेपाच वाजता ठाणे गाठले. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या या या कासवगतीच्या प्रवासाने वैतागलेल्या अनेक प्रवाशांनी यावेळी रूळांतून चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे एकामागोमाग लागलेल्या गाडय़ांच्या रांगा आणि त्यात चालत निघालेले प्रवासी असे चित्र दिव्याजवळ पाहायला मिळत होते.
मध्य रेल्वेच्या अशा भोंगळ कारभाराचा प्रवाशांना मागील काही दिवसांत अनेकदा फटका बसला असून नुकतीच विठ्ठलवाडी येथे रूळ तुटून लोकल घसरल्याने १४ तास रेल्वेसेवा ठप्प झाल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे रेल्वेचा कारभार कधी सुधारणार? असा प्रश्न त्रस्त प्रवाशांमधून विचारला जात आहे.