दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा भारतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे.
नवी दिल्ली- दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा भारतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमाभागात पंजाब आणि राजस्थान हे देखील दहशतवाद्यांच्या निशान्यावर असल्याची माहिती आहे.
पाकिस्तानमधील २० ते २१ जणांचा समुहाने भारतात प्रवेश केला आहे. प्रत्येकाने भारतात येऊन आपला वेगवेगळा समुह तयार केला असून त्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून हल्ल्लाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मिळते. हे लहान समुह वेगवेगळ्या विभागात जाऊन तेथे आत्मघातकी हल्ले करून अराजक माजवण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आहे.
भारताने सुरक्षेच्या दृष्टीने ठोस अशी पावले उचलून दिल्ली आणि मुंबईसह इतर मेट्रो शहरांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, हॉटेल्स आणि पर्यटनस्थळे तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.