नूतन वर्षासाठी जोरदार सेलिब्रेशन सुरू असतानाच सांताक्लॉजच्या वेषात आलेल्या दोन हल्लेखोरांनी चढवलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३९ नागरिक ठार झाल्याची घटना तुर्कस्थानातील इस्तानबूल नाईट क्लबमध्ये घडली.
इस्तानबूल- नूतन वर्षासाठी जोरदार सेलिब्रेशन सुरू असतानाच सांताक्लॉजच्या वेषात आलेल्या दोन हल्लेखोरांनी चढवलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३९ नागरिक ठार झाल्याची घटना तुर्कस्थानातील इस्तानबूल नाईट क्लबमध्ये घडली.
यात अनेक परदेशी ठार झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली तरी हा हल्ला ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्यामुळे २०१५ साली पॅरिसमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या रक्ततपाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पॅरिसमधील हल्ल्यात १३० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तुर्कस्थातानमधील गोळीबारात एक पोलीस व एक नागरिक ठार झाला असून ५० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. संशयित हल्लेखोरांना आम्ही लवकरच अटक करू, असा विश्वास मंत्री सुलेमान सोयलू यांनी व्यक्त केला आहे.
हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू
तुर्कस्थानातील दहशतवादी हल्ल्यात अबीस हसन रिझवी याचा मृत्यू झाला असून तो राज्यसभेचे माजी खासदार आणि वांद्रे मुंबई येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अख्तर हसन रिझवी यांचा मुलगा होता. या हल्ल्यात गुजरातमधील खुशी शहा यांचाही मृत्यू झाला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या मृत्यूबद्दल दुजोरा दिला आहे.