चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, बीएसएफचा एक जवान शाहिद
श्रीनगर- श्रीनगर येथील विमानतळाजवळच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ कॅम्प) एका इमारतीत घुसून पहाटे साडेचारच्या सुमारास तीन दशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांना बीएसएफ जवानांनी देखील गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आले आहे. तर जखमी झालेला एक जवान शहीद झाला आहे. बीएसएफच्या १८२व्या तुकडीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
सीआरपीएफ, ५३ राष्ट्रीय रायफल्स, बीएसएफ आणि विशेष ऑपरेशन ग्रुप (एसओजी) यांनी इमारतीला चारही बाजुने घेरुन तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचे एएसआय बी. के. यादव हे शहीद झाले असून तीन भारतीय जवान जखमी झाले आहेत.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने बीएसएफ कॅम्पवरील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या दहशतवादी हल्ल्यामुळे श्रीनगर विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. अनेक पर्यटक विमानतळावरच रखडले होते. सर्व वाहने आणि प्रवाशांना विमानतळाकडे जाण्यापासून रोखले गेले. विमानतळ कर्मचा-यांनाही विमानतळाकडे जाण्यास बंदी घातली होती. परंतु आता कर्मचा-यांना विमानतळाकडे जाण्यास परवानगी दिली गेली आहे. घटनास्थळी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
या दहशतवादी हल्ल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काश्मीर खो-यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या.
दहशतवादी चालत आले, विमानतळ उडवायचे होते
श्रीनगर विमानतळाजवळ हल्ला करणारे दहशतवादी कोणत्याही गाडीत बसून आले नव्हते. शांतपणे पायी चालत येऊन त्यांनी हा हल्ला घडवला. श्रीनगर विमानतळ उडवून देण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, पण विमानतळावर प्रचंड बंदोबस्त असल्याने त्यांचा हा डाव फसला आणि त्यांना मोर्चा दुसरीकडे वळवावा लागला.