रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत गतविजेता मुंबईने दुस-या दिवसअखेर सोमवारी ४ बाद १७१ धावा केल्या.
राजकोट- रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत गतविजेता मुंबईने दुस-या दिवसअखेर सोमवारी ४ बाद १७१ धावा केल्या. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी त्यांना आणखी १३४ धावांची आवश्यकता आहे. तामिळनाडूने पहिल्या डावात ३०५ धावांची मजल मारली आहे.
मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. पहिलीच प्रथमश्रेणी लढत खेळणा-या १७ वर्षीय पृथ्वी शॉला (४) पहिल्याच षटकात माघारी धाडण्यात तामिळनाडूचा मध्यमगती गोलंदाज अश्विन क्रिस्टला यश आले. तिस-या क्रमांकावरील सूर्यकुमार यादवने अन्य सलामीवीर प्रफुल वाघेलासह दुस-या विकेटसाठी शतकी (१२१) भागीदारी करताना मुंबईला सावरले.
मात्र या भागीदारी फुटल्यानंतर गतविजेत्यांचा डाव कोसळला. सूर्यकुमारला बाद करत मध्यमगती विजय शंकरने तामिळनाडूला मोठे यश मिळवून दिले. सूर्यकुमार यादवने ११६ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले. त्याच्यानंतर वाघेला (४८) आणि सिद्धेश लाड (१९) एकाच षटकात माघारी परतल्याने मुंबई संघ अडचणीत आला. १ बाद १२४ वरून त्यांची अवस्था ४ बाद १२८ धावा अशी झाली.
कर्णधार आदित्य तरेने (खेळत आहे १९) श्रेयस अय्यरसह (खेळत आहे २४) पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची नाबाद भागीदारी करताना मुंबईची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबईला आघाडी घेण्यासाठी अद्याप १३४ धावांची गरज आहे. या जोडीसह अष्टपैलू अभिषेक नायरच्या कामगिरीवरच त्यांची आघाडी अवलंबून आहे.
तत्पूर्वी, ६ बाद २६१वरून तामिळनाडूने पहिल्या डावात ३०५ धावा केल्या. त्यांच्या तळातील सहा फलंदाजांनी ४४ धावांची भर घातली. नाबाद फलंदाज विजय शंकर (५०) अर्धशतकानंतर लवकर परतला. मात्र अष्टपैलू अश्विन क्रिस्टने (३१) चांगले योगदान देत संघाला तीनशेपार नेले. मुंबईतर्फे मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि अभिषेक नायर (प्रत्येकी ४ विकेट) सर्वात यशस्वी ठरले.
संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू – पहिला डाव ३०५(बाबा इंदरजीत ६४, कौशिक गांधी ५०, बाबा अपराजित ५०, शार्दूल ठाकूर ७४-४, अभिषेक नायर ६६-४) वि. मुंबई – पहिला डाव ४ बाद १७१(सूर्यकुमार यादव ७३, प्रफुल वाघेला ४८, विजय शंकर १४-१).