मुंबई- उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तरित्या कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी सलीम खान याला सोमवारी मुंबई विमानतळावर अटक केली.
सलीम हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील बंदीपूर गावचा रहिवासी आहे. सलीम खान हा २००८ पासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडावर होता. सलीमने २००७ साली पाकिस्तानमधील मुजफ्फराबादच्या कॅम्पमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते.
२००८ मध्ये रामपूर सीआरपीएफ हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दहशतवादी कौसर आणि शरीफ यांनी सलीमने आपल्यासोबत मुझफ्फराबादेत प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली होती.
सलीमला अटक झाल्याने पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते. नुकतेच अटक केलेला आयएसआयचा हस्तक आफताब याला सलीम परदेशातून सूचना देत होता. तसेच त्याला वित्तपुरवठाही करत होता. सलीमने लष्करसाठी हेरगिरी करणा-यांना आर्थिक रसद पुरवली होती. सलीमच्या दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशमधून लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला अटक झाल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील एटीएसने उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधून संदीप शर्मा याला अटक केली होती. दहशतवाद्यांसाठी कार चालवण्याचे काम तो करायचा. दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलीस कर्मचा-यांची हत्या आणि बँक लुटीसारख्या घटनांमध्ये संदीप सहभागी होता.
जम्मू- काश्मीर पोलिसांच्या कारवाईतूनच सलीमचा खुलासा झाला होता. तो आज भारतात येणार असल्याची माहिती संदीपकडून मिळाल्यावर एटीएसने मुंबई विमानतळावरून सापळा रचून सलिमला अटक केली.
दरम्यान, सलिम खान मुंबईत कशासाठी आला होता. तो कुठे थांबणार होता, याचा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएस पोलिस कसून तपास करत आहेत.