देशातील संवैधानिक संस्थांना अस्थिर करतानाच समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केंद्रातील मोदी सरकार करत आहे, अशी जळजळीत टीका कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
नवी दिल्ली- देशातील संवैधानिक संस्थांना अस्थिर करतानाच समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केंद्रातील मोदी सरकार करत आहे, अशी जळजळीत टीका कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. लोकसभेत बहुमत मिळाले म्हणजे जनतेवर संकुचित विचारधारा लादण्याचा परवाना मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉँग्रेसच्या संसदीय पक्ष मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून संवैधानिक संस्थांना अस्थिर करण्याचे काम मोदी सरकारकडून सुरू आहे. राज्यघटनेतील मूल्यांना हरताळ फासला जात असून समाजात फूट पाडून जातीय ध्रुवीकरण केले जात आहे.
दलित, आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. गुजरातमध्ये दलितांना झालेली अमानुष मारहाण हा त्याचाच एक प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली. हिजबुलचा दहशतवादी बुरहान वाणी याच्या हत्येनंतर ११ दिवस काश्मीर अशांत आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात ४० जणांचा बळी गेला. काश्मीरमधील हिंसाचार हा देशासाठी धोकादायक आहे.
राष्ट्रीय सुरक्षेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. दोन र्वष झाल्याबद्दल सरकारने आपली पाठ थोपटून घेतली, त्याचा समाचार घेताना गांधी म्हणाल्या की, वास्तवाकडे दुर्लक्ष, खोटे दावे, विरोधकांवर खोटे आरोप करण्यात आले. त्यांनी चांगली कामगिरी केल्याचा आभास निर्माण केला. मात्र, त्यांनी दोन वर्षात कोणती कामगिरी केली हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.