नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्य माणूस पूर्णपणे कोलमडून पडला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे, महंगाई कम करेंगे’ सांगत सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार सर्व पातळय़ांवर अपयशी ठरले आहे.
नागपूर- नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्य माणूस पूर्णपणे कोलमडून पडला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे, महंगाई कम करेंगे’ सांगत सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार सर्व पातळय़ांवर अपयशी ठरले आहे.
भाजपाचे हे अपशय जनतेसमोर मांडून काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्धार करा, असे जोरदार आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. काँग्रेसचे लोक जसे बोलतात तसे वागतात असा विश्वास पुन्हा लोकांमध्ये निर्माण करा, असेही ते म्हणाले.
नागपूर युवक काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचा मेळावा नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण राणे होते, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार सुनील केदार, आमदार नितेश राणे, आमदार अनंत गाडगीळ, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार डॉ. नितीन राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवक काँग्रेस शहर अध्यक्ष कुणाल राऊत यांनी कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन केले होते. अध्यक्षपदावरून बोलताना नारायण राणे पुढे म्हणाले की, लोकसभा, विधानसभा या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठया पराभवाला सामोरे जावे लागले.
अलिकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्ष दुस-या क्रमांकावर आहे. आपल्या नेत्या सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा करीत असताना आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यश हे सहज मिळत नाही, तर ते खेचून आणावे लागते. त्यासाठी कठोर परिणाम आणि त्याग करावा लागतो.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आज सत्तराव्या वर्षीही प्रकृती बरी नसताना उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारासाठी धावपळ करीत आहेत. उपाध्यक्ष राहुल गांधी दिवसरात्र दौरे करून लोकांमध्ये जनजागरण करत आहेत. अशा वेळेला आपण नेमके काय करीत आहोत, असा विचार काँग्रेसच्या नेत्यांनी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे.
खरे तर विद्यमान भाजपा सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी अनेक मुद्दे आपल्या जवळ आहेत. २०१४ च्या लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीत भाजपाने लोकांना मोठमोठी आश्वासने दिली. अच्छे दिन आयेंगे, महेंगाई कम करेंगे अशा घोषणा दिल्या. पण एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.
उलट नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. लोकांच्या मनात भाजपाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भाजपाचे हे अपयश जनतेसमोर मांडून पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणण्याचा निर्धार केला पाहिजे, असेही नारायण राणे म्हणाले.
काँग्रेसची त्यागाची परंपरा
या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी करँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्राणाचे बलिदान दिले आहे. कारावास भोगला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी यांना पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र त्यांनी पंतप्रधानपदाचा त्याग करून पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान केले. तीच परंपरा ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत, त्या सोनिया गांधी यांनी पुढे चालविली.
काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळालेले असताना सर्वानी सोनिया गांधी यांनीच पंतप्रधान व्हावे, असे मत व्यक्त केले होते. मात्र त्यांनी विनम्रपणे पंतप्रधानपदाचा त्याग केला. इतकेच नव्हे तर आंतरराराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले.
या देशाच्या एकात्मतेसाठी श्रीमती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या आई आणि मुलाने देशासाठी बलिदान दिले. ही त्यागाची परंपरा इतर कोणत्या पक्षात आहे का? असा सवाल करून नारायण राणे म्हणाले की, काँग्रेसची त्यागाची परंपरा लोकांसमोर मांडा. त्यासाठी खूप परिश्रम घ्या, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा. यश पुन्हा आपलेच असेल. चला पुन्हा काँँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी कठीबद्ध होऊ या, असे आवाहन राणे यांनी करताच सभागृह टाळय़ांच्या गजराने दणाणून गेले.
काँग्रेस मजबूत करून सोनिया गांधींना वाढदिवसाची भेट देऊ या! आमदार नितेश राणे यांचे आवाहन
काँग्रेसला मजबूत करून पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्धार करून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसाची भेट देऊ या, असे आवाहन युवा आमदार नितेश राणे यांनी केले. युवक काँग्रेसचे काम करताना तुम्हाला कोणतीही अडचण आली तर मला हाक द्या, तुमच्या मदतीला मी धावून येईल, असे सांगताच सभागृहात टाळय़ांचा एकच कडकडाट झाला.
भाजपा सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आतून धास्तावले आहेत. चेहऱ्यावर मात्र ते दिसू देत नाही, असे सांगून नितेश राणे म्हणाले की, त्यांचा हा चेहरा उघडा करण्याचे काम युवक काँगेसच्या कार्यकर्त्यांना करावे लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल.
तीन वर्षे आपल्या हातात आहेत. या तीन वर्षात भाजपा सरकारचा बेगडी आणि खोटा चेहरा जनतेसमोर आणता आला पाहिजे. मात्र हे घरी बसून होणार नाही, त्यासाठी आपल्याला अपार कष्ट घ्यावे लागतील.संपूर्णपणे झोकून द्यावे लागेल. आपण पक्षामध्ये केवळ पदासाठी आणि लाभासाठी नाही, तर सेवेसाठी आहोत याचे भान कार्यकर्त्यांंनी कायम ठेवले पाहिजे. तुम्ही काम केले की पदे तुमच्या मागे चालत येतील, असेही नितेश राणे म्हणाले.
उपस्थित नेत्यांना उद्देशून ते म्हणाले की, जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांना पाठबळ देण्याचे काम नेत्यांनी द्यावे. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे. मी स्वत: युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला शब्द देतो की, तुम्ही काम करा. त्यात काही अडचण आली तर एक कार्यकर्ता म्हणून मला हाक मारा, मी धावून आल्याशिवाय राहणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगताच सभागृहातून अनुमोदनाचे हुंकार उमटले.