मागील काही दिवसांपासून ठाण्यातील आंदोलनांमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांच्याच पक्षाचे सर्वच्या सर्व सात नगरसेवक ऐन निवडणुकीच्या तोंडावर झटका देण्याच्या तयारीत आहेत.
ठाणे- मागील काही दिवसांपासून ठाण्यातील आंदोलनांमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांच्याच पक्षाचे सर्वच्या सर्व सात नगरसेवक ऐन निवडणुकीच्या तोंडावर झटका देण्याच्या तयारीत आहेत. हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून केवळ त्यांना तिकीटाची शाश्वती मिळत नसल्याने त्यांनी प्रवेश लांबवल्याचे बोलले जात आहे.
९ मार्च २००६ रोजी उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वर्षभरातच म्हणजे २००७ साली झालेल्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीत ३ नगरसेवक निवडून आणले होते. त्यानंतर २००९ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्येही मनसेचे ठाणे जिल्ह्यातून दोन आमदार निवडून आले होते. तर २०१२ साली झालेल्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते.
मात्र हे नगरसेवक पक्षांतर्गत गटबाजी, गटनेते सुधाकर चव्हाण यांच्यावर झालेली कारवाई या कारणांमुळे पक्षापासून दुरावत गेले. शहरात होणारे पक्षाचे कार्यक्रम, आंदोलने यातही त्यांची अनुपस्थिती जाणवू लागली. त्यात यापैकी अनेकजण हे पहिल्यांदाच आणि राज ठाकरेंच्या करिष्म्याने निवडून आलेले होते.
मात्र पक्षाची सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता आगामी निवडणुकीत राज ठाकरेंच्या नावाचा करिष्मा कितपत चालेल? अशी धाकधूक असल्याने या सातही जणांनी शिवसेनेशी जवळीक साधल्याचे समजते. त्यांनी वारंवार पक्षाचे कार्यक्रम, कार्यशाळा यांना दांडी मारली असून शिवसेनेच्या नेत्यांसह मात्र त्यांच्या अनेकदा ‘बैठका’ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र आगामी निवडणुकीत चार प्रभागांचा पॅनेल आणि त्यात शिवसेनेत तिकीटाची कुठलीही गॅरंटी नाही, अशी परिस्थिती असल्याने या सात जणांचा प्रवेश लांबणीवर पडला असून काहींनी भाजपातून तिकीट मिळेल का? याचीही चाचपणी सुरू केल्याचे समजते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून पक्षाला अडचणीत आणण्याचे त्यांचे मनसुबे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.