शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या वल्गना करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र निर्धास्त असून सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.
मुंबई- शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या वल्गना करीत असताना आणि शनिवारच्या महागाईच्या आंदोलनावरून दोन्ही पक्षांत ‘राडा’ झाल्यानंतरही शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्धास्त असून सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
दसरा मेळाव्यात सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा नाही
‘राजीनामे खिशातच आहेत’, ‘राजकीय भूकंप होईल’, ‘आता निर्णयाची वेळ जवळ आलीय’, असे इशारे, धमक्या शिवसेनेने भाजपला अनेक वेळा दिल्या आहेत. आताही दसरा मेळाव्यात शिवसेना पुन्हा एकदा भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडून सत्तेचा लाभ घेणेच पसंत करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मुख्यमंत्री २५ सप्टेंबरला विदेश दौ-यावर जात असून २९ सप्टेंबरला ते परततील आणि ३० सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाला नागपुरात उपस्थित राहतील. मुख्यमंत्री दीक्षाभूमीवर असताना त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण देतील.
शिवसेनेचे २७ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नुकताच केला होता. त्यानंतर लगेचच अपक्ष आमदार रवी राणा यांनीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडली, तर २० ते २२ आमदार भाजपला पाठिंबा देतील, असा दावा केला आहे. त्याआधी, ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत, ६३ पैकी सुमारे २५ आमदारांनी सत्ता सोडण्याचा निर्णय मान्य नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठी ताकही फुंकून पित आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेली माहिती अशी की, ३० सप्टेंबरला मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेणार नाहीत याची फडणवीस यांना खात्री आहे. त्यामुळेच त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात कोणताही बदल केलेला नाही. सरकारबाबत कोणतीही काळजी नसल्याचे सांगत त्यांनी निकटवर्तीयांनादेखील निर्धास्त केले आहे.
शिवसेनेकडून केंद्र आणि राज्याच्या अनेक निर्णयांवर टीकेची झोड सुरू आहे. महागाईच्या विरोधात हजारो शिवसैनिक शनिवारी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. त्यातून त्यांच्या मनातील द्वेषच दिसून आला. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा वादळी ठरू शकतो, असे बोलले जात होते. परंतु, उद्धव ठाकरे सत्ता सोडण्याचा कुठलाही निर्णय जाहीर करणार नसल्याचे आतल्या गोटातून कळते. सत्तेत राहूनच भाजपला लक्ष्य करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. ठाकरे शेवटपर्यंत कुठलाही टोकाचा निर्णय घेणार नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामागचे प्रमुख कारण पक्ष फुटण्याची भीती हेच असल्याचे समजते.
सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेच्या मंत्र्यांनाही त्यांच्या पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे असे वाटत नाही. त्याचवेळी चार दिवसांपूर्वी सरकारमधून बाहेर पडण्याची गळ घालणारे शिवसेनेचे आमदार आता त्याऐवजी शिवसेना मंत्र्यांना हटवा आणि नवीन चेह-यांना संधी द्या यासाठी आग्रही आहेत.
जाणकारांच्या मते, शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपा, केंद्र व राज्य सरकारवरील तीव्र टीका यापुढेही सुरू राहील. भाजपाचे प्रवक्ते, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे आ. अनिल परब, आ. नीलम गो-हे हे एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका करीत राहतील आणि त्याद्वारे सत्तारुढ पक्षाबरोबरच विरोधकांची जागा युतीतीलच पक्ष भरून काढतील, हे आतापर्यंतचे सूत्र पुढे कायम राहण्याची शक्यता आहे.