दस-याच्या दिवशी भ्रष्टाचाररूपी रावणाच्या दहनावरून सेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला होता.
मुंबई- दस-याच्या दिवशी भ्रष्टाचाररूपी रावणाच्या दहनावरून सेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला होता. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली असून मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना २७ ऑक्टोबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या सुनावणीनंतर सेना कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरुद्ध न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रसंगी भाजपाचा एकही नेता न्यायालय परिसरात नव्हता. मात्र या निकालावरून पालिका निवडणूक तोंडावर असताना सेना-भाजपा संघर्ष आणखीनच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजयादशमीनिमित्त खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली मुलुंड येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही हजर होते. हा कार्यक्रम सुरू असताना काही शिवसैनिकांनी कार्यक्रमात घुसून हल्लाबोल करत रावण दहन करत भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भाजपामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत भाजपाचे सहा तर सेनेचे तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी करत भाजपा नेत्यांनी आंदोलन केल्यानंतर नवघर पोलिसांनी या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करत १४ जणांना अटक केली.
मात्र, दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हात उगारला असताना पोलीस मात्र भाजपा नेत्यांचीच पाठराखण करत असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान, सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या बाहेर सेना कार्यकर्त्यांनी गर्दी करून सोमय्या यांच्याविरुद्ध जोरदार नारेबाजी सुरू केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण दिसून आले.
अटक कार्यकर्त्यांची नावे
उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी, अनंत म्हाब्दी, महेंद्र वैती, शाखाप्रमुख अविनाश बागुल, दीपक सावंत, आनंद मुंडे, महेश चवरे, बाबा भगत, दिनेश जाधव, उपशाखाप्रमुख सुनील गोरे, निलेश ठाकूर, किरण नांदे, निलेश सावंत आणि किशोर भोईर