राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली.
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी पवार यांनी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली मग महाराष्ट्रातही द्या, अशी मागणी मोदींकडे केली.
शरद पवार यांनी यावेळी शेतकरी आत्महत्येवरूनही मोदींशी चर्चा केली. ते म्हणाले की, ‘देशभरात दरवर्षी १२ हजार आत्महत्या होतात, अशी सरकारची सर्वोच्च न्यायालयातील आकडेवारी सांगते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांत ही आकडेवारी सगळ्यात जास्त आहे. या तीन राज्यांमध्ये कर्जमाफीची गरज जास्त आहे. म्हणून तुम्ही हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा.’ महाराष्ट्रातले शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन नसल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
यावर बोलतांना नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफी ही उत्तर प्रदेशसाठी होती इतर राज्यांसाठी नव्हती. तसेच मालाचे नुकसान शेतकरी करणार नाही असेही म्हणाले. सरसकट कर्जमाफी न करण्याचे संकेत देत मोदींनी ‘राज्यातील परिस्थितीवर राज्य सरकार निर्णय घेईल,’ असे सांगून शरद पवार यांची बोळवण केली.