राज्यामध्ये मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत असताना सरकारकडून त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट झालेली नाही.
मुंबई- राज्यामध्ये मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत असताना सरकारकडून त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे समाजातील अस्वस्थता वाढत आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा, ‘‘मराठा समाजामधील अस्वस्थता लक्षात घेऊन सरकारने आरक्षण देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा,’’ असे मत मंगळवारी उरण येथे व्यक्त केले.
मराठा समाजाचे मोर्चे कोणत्याही समाजाच्या विरोधात असल्याची शक्यता त्यांनी सपशेल फेटाळून लावली. ते म्हणाले की, मराठा समाजाचे मोर्चे उत्स्फूर्तपणे निघत आहेत. त्यात कोणाविरोधात घोषणा दिल्या जात नाहीत. अत्यंत शांततेने हे मोर्चे निघत आहेत. तरीही हे मोर्चे काही समाजाच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.
तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. आरक्षणाच्या बाबतीत तरुणांच्या भावना तीव्र आहेत. म्हणूनच सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.
मोदी बदललेले दिसतात
उरी आणि पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘पठाणकोट आणि उरी येथे झालेले दहशतवादी हल्ले ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याबाबत जो काही निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा असेल तो लष्करप्रमुखांशी चर्चा करून घेतला पाहिजे, असे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पवार यांनी जोरदार कोपरखळी लगावली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ‘‘पाकिस्तान को लव्ह लेटर लिखना बंद करो.’’ अशा शब्दांत त्यावेळच्या केंद्र सरकारला आणि पंतप्रधानांना सल्ला देत होते. आता मात्र त्यांची भाषा बदललेली दिसते. त्यांत बदल झालेला दिसतो.’’