मराठा समाजाच्या मोर्चाची सरकारने योग्य वेळी दखल घेतली नाही, समंजस भूमिका घेण्याऐवजी मुख्यमंत्री वेगवेगळी विधाने करून या असंतोषात भर घालीत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.
मुंबई- राज्यात निघणा-या मराठा समाजाच्या मोर्चाची सरकारने योग्य वेळी दखल घेतली नाही, म्हणून असंतोष वाढला. या असंतोषाला सामोरे जाण्याऐवजी, समंजस भूमिका घेण्याऐवजी मुख्यमंत्री वेगवेगळी विधाने करून या असंतोषात भर घालीत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. मराठा मोर्चाला मराठा नेत्यांची फूस असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप धांदात खोटा असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.
मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री वाहिनीवर घेतलेली मुलाखत अनेक वाहिन्यांनी दाखविली. त्यात त्यांनी मराठा समाजाच्या मोर्चाला मराठा नेत्यांची फूस असल्याचा आरोप केला होता. त्याचा पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, मराठा समाजाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषत: मराठा आरक्षण, कर्जमाफी, शेतीचे काही प्रश्न आहेत. राज्यकर्ते सरकार याबाबत असंवेदनशील असल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे असणारी अस्वस्थता हे मोर्चाचे मुख्य कारण आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबीत आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यात मराठा समाजाला सवलती मिळतात. आपल्या इथेही कुणबी समाजाला विदर्भात सवलती मिळतात. इतरांना मिळत असतील तर आम्हालाच का मिळू नयेत? असा मराठा समाजाचा सवाल आहे. केंद्राच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारनेही मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीत आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांशी सहमत आहोत, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांनी केवळ सहमत आहे, असे म्हणून चालत नाही. त्यांनी कृती करण्याची गरज आहे. त्यांनी सहमती दर्शविली असेल तर आता कृती करावी. आता सहमती दर्शविण्याची नव्हे तर कृती करण्याची वेळ आली आहे, असे परखड बोल पवार यांनी सुनावले. माझ्या हातात सत्ता नाही. जे राज्यकर्ते आहेत, त्यानी या प्रकरणी ठोस भूमिका घेऊन तात्काळ कृती करणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.
आठवलेंना खडसावले
राज्यात मराठा मोर्चामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेले असताना, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले प्रतिमोर्चे काढण्याची भाषा करीत आहेत. त्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण असताना केंद्रीय मंत्र्याने जबाबदारी वक्तव्य केले पाहिजे. ते प्रति मोर्चे काढण्याची भाषा करीत आहेत. कुणाविरोधात तुम्हाला मोर्चे काढायचे आहेत. समस्या गंभीर असते तेव्हा विनोद किंवा काव्य करून चालत नाही, असा टोला पवार यांनी रामदास आठवले यांना लगावला. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चा न काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पवार यांनी स्वागत केले.