राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्यासंबंधीचे वृत्त शरद पवारांनी खोडून काढले.
बारामती- राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्यासंबंधीचे वृत्त आता स्वत: शरद पवारांनीच खोडून काढले आहे. मी कदापिही एनडीएसोबत जाणार नाही, त्यामुळे केंद्रात पुन्हा मंत्री होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. पवारांच्या या खुलाशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रमही एकदाचा मिटला आहे.
मोदी आणि पवारांच्या मैत्रीमुळे गेल्या आठवडय़ापासून यासंबंधीच्या बातम्या येत होत्या. स्वत: शरद पवार यावर काहीच बोलत नसल्याने कार्यकर्त्यांची खुलासे देताना मोठी पंचाईत होत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडखोर मंत्री सदाभाऊ खोत यांनाही पवारांनी टोला लगावला. राजू शेट्टींनी एनडीए सोबतची युती तोडली तरी स्वाभिमानीच्या वाटय़ाचे मंत्रिपद सदाभाऊ खोत यांना सोडवत नाही, असा टोमणा पवारांनी हाणला.
राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पवारांनी प्रथमच त्यांच्या भूमिकेचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आणि सदाभाऊंना पुन्हा टार्गेट केले. पावसाच्या पूरस्थितीवरूनही पवारांनी शिवसेनेला फटकारले. २६ जुलैच्या पूरस्थितीतूनही मुंबई मनपाचा सत्ताधारी पक्षाने काहीच धडा घेतला नसल्यानेच मंगळवारी सगळीकडे पाणी भरल्याचा आरोप पवारांनी केला.
[EPSB]
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात केली.
[/EPSB]