राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेच्या गुंडगिरीबद्दल बोलतात, मात्र गृहखात्याचा कारभार त्यांच्याकडेच असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे मुख्यमंत्र्यांचे काम आहे.
ठाणे- राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेच्या गुंडगिरीबद्दल बोलतात, मात्र गृहखात्याचा कारभार त्यांच्याकडेच असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. त्यामुळे त्यांनी सहकारी पक्षाच्या गुंडांना गजाआड केले पाहिजे, मात्र ते तसे करणार नाहीत, कारण त्यांना त्यांची खुर्ची जाण्याची भीती वाटते, अशी टीका करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटले. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी कळवा येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
शिवसेना आणि भाजपा सध्या एकमेकांवर मोठी टीका करत असून प्रत्येक सभेत एकमेकांची लक्तरे काढत आहेत. मात्र दिवसा टीका करायची आणि रात्री मांडीला मांडी लावून बसायचे, असे या दोघांचे धोरण आहे. मुख्यमंत्री सध्या शिवसेनेच्या गुंडगिरीचे दाखले देत आहेत, मात्र तुम्ही सत्तेत एकत्र आहात, त्यामुळे तुम्हाला अशी टीका करण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
ठाणेकर मागील अनेक वर्षापासून शिवसेनेला निवडून देत आहेत. मात्र शिवसेनेने ठाणेकरांसाठी काहीही केलेले नसून उलट मालमत्ता कर वाढवला आहे. आता यंदाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास कर कमी करण्याचे आश्वासन ते देत आहेत, हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असल्याची टीका पवार यांनी केली.
शिवसेनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून अशा लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, शिवसेनेमुळे ठाण्याच्या विकासाला ओहोटी लागली असून इतक्या वर्षात शिवसेनेला ठाण्यात एकही सांगण्यासारखे काम करता आलेले नाही. पाणी, घनकचरा या सगळयाच्या बाबतीत पालिकेचे नियोजन चुकले असून ठाण्याचा चेहरा बदलायचा असेल, तर नेतृत्व आणि राज्यकर्ते बदलायला हवेत, असे आवाहन शरद पवार यांनी केले.