गेल्या ५० वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहांत काम करण्याची संधी केवळ मला महाराष्ट्रातील जनतेमुळेच मिळाली.
पुणे- गेल्या ५० वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहांत काम करण्याची संधी केवळ मला महाराष्ट्रातील जनतेमुळेच मिळाली. त्यामुळे माझ्या यशाची वाटेकरी जनता असून सत्कार करायचा झाल्यास जनतेचाच करावा, अशी कृतज्ञता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वष्रे पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पध्रेची अंतिम फेरी विद्यानगरीत झाली. या स्पध्रेतील पारितोषिक वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हेमंत टकले, निरंजन डावखरे, सुनेत्रा पवार, संग्राम जगताप, महेश तपासे, पौर्णिमा तावरे, किरण गुजर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, राज्यातील दोन व संसदेतील दोन अशा देशातील चार महत्त्वाच्या सभागृहांत काम करण्याची संधी केवळ महाराष्ट्रातील जनतेमुळेच मिळाली. त्यामुळे माझा सत्कार करण्यापेक्षा खरे सत्कारमूर्ती ही जनता आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत आहोत.
सुनील तटकरे यांनी शरद पवार यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सुप्रिया सुळे यांनी केले. दरम्यान, ललिता बाबर, संतोष गर्जे, हेमलता तिवारी, दत्तू भोकनळ यांना पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले.