राज्याचे सहकार व पनणमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या ‘लोकमंगल अॅग्रो’ कंपनीने गरीब शेतक-यांचे सुमारे ७२.५२ कोटी रुपये बुडवल्याचा स्पष्ट आरोप काँग्रेसचे युवा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
मुंबई- राज्याचे सहकार व पनणमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या ‘लोकमंगल अॅग्रो’ कंपनीने गरीब शेतक-यांचे सुमारे ७२.५२ कोटी रुपये बुडवल्याचा स्पष्ट आरोप करीत काँग्रेसचे युवा आमदार नितेश राणे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात सरकारने कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी शुक्रवारी विधानसभेत केली. त्यामुळे फडणवीस सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांमध्ये आणखी एका मंत्र्याची वाढ झाली आहे.
शुक्रवारी विधानभवनात नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख संचालक असलेल्या ‘लोकमंगल अॅग्रो कंपनी’ने गुंतवणूकदार शेतक-यांकडून ७२.५२ कोटी उभारल्याप्रकरणी ठपका ठेऊन सेबीने कंपनी व संचालकांच्या व्यवहारावर बंदी घातली आहे. यासंबधीचे वृत्तही काही वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध झाले आहे.
शुक्रवारी विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून हा विषय सभागृहासमोर आणला. विशेष म्हणजे जेव्हा नितेश राणे हा मुद्दा मांडत होते. तेव्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख सभागृहात उपस्थित होते. त्यांनी यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. याबाबत नितेश राणे म्हणाले की, ‘लोकमंगल अॅग्रो कंपनी’ने सोलापूरमध्ये गरीब शेतक-यांचे ७२.५२ कोटी रुपये डुबवले आहेत. सेबीने याबाबत त्यांच्याविरोधात गंभीर कारवाई केली आहे. लोकमंगल अॅग्रोच्या कंपनीच्या संचालक पदी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या सहकार या महत्त्वाच्या खात्याचीही जबाबदारी आहे. त्यामुळे या शेतक-यांना फसवणा-या मंत्र्याविरोधात सरकार कडक भूमिका घेणार का, असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
लोकमंगलने २०१२ मध्ये चार हजार ७५१ गुंतवणूकदार शेतक-यांकडून हे पैसे उभारले होते. ते व्याजासह गुंतवणूकदारांना दिले आहेत का? याबाबत संस्थेला कारणे दाखवा नोटीसही जारी केली गेली आहे. लोकमंगल अँग्रो प्रामुख्याने साखर उत्पादक म्हणून ओळखले जाते.