अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीसारख्या घटना या गंभीर असून अशा प्रकारच्या घटनांमुळे राज्यात महिलांवर अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीसारख्या घटना या गंभीर असून अशा प्रकारच्या घटनांमुळे राज्यात महिलांवर अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. इतर प्रकारचे गुन्हेही राज्यात वाढत आहेत. या सर्व गुन्ह्यांच्या मागे व्यसनाधीनता हे मुख्य कारण असून सरकारने यासाठी विधिमंडळात कायदा करावा व व्यसनाधीनतेला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी गावांमध्ये ग्रामसंरक्षण दल स्थापन करावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
राज्यात वाढते गुन्हे व महिलांवरील अत्याचार व त्यातच कोपर्डीसारख्या घटना व अन्य मुद्दय़ांवर हजारे यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अवैध दारू धंदे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेला येत असलेले अपयश मुख्यमंत्र्यांपुढे सांगितले.
या अपयशामुळेच राज्यात आता ग्रामसंरक्षण दल स्थापन करावे व या दलाला अधिकार देऊन गावातील अवैध धंदे रोखण्यासाठीचे कामे देऊन त्यांना नियुक्त करावे. त्यासोबत राज्यात कोणत्याही व्यक्तीविरोधात जर तीन वेळा प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाले तर अशा व्यक्तीला तीन वर्षे तडिपारीचा आणि ३ ते १० वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा कायदाही राज्य सरकारने करावा, अशी मागणीही हजारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ग्रामसंरक्षण दलासोबतच लोकांच्या हातात सत्ता देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करा, अशी सूचनाही हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या.