संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय होणार आहे.
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्या मुलीला न्याय मिळेल, अशी आशा निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश या चारजणांना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय होणार आहे.
१६ डिसेंबर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता आणि तिची अमानुष हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. यावर अल्पवयीन आरोपीसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहा आरोपींपैकी एक आरोपी राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर सहावा आरोपी अल्पवयीने असल्याने त्याला तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवल्यानंतर त्याची सुटकाही करण्यात आली.
कनिष्ठ न्यायालयाने १३ सप्टेंबर २०१३ रोजी चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या आरोपींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. १३ मार्च २०१४ ला चारही आरोपींची ही या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपी मुकेश पवन आणि त्याचा वकिल एमएल शर्मा यांनी १५ मार्च २०१४ रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर इतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करत फाशीवर स्थगिती आणली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय २७ मार्च रोजी राखून ठेवला होता. मात्र त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.