पाण्याचा स्त्रोत पुरेसा नसेल तर विकासाला खीळ बसते. सरदार सरोवरामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
दाभोई- पाण्याचा स्त्रोत पुरेसा नसेल तर विकासाला खीळ बसते. सरदार सरोवरामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पूर्ण झालेल्या या धरणामुळे केवळ गुजरातचाच नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या या चार राज्यांचा विकास होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जगातील सर्वात मोठे दुसरे धरण ठरण्याचा मान या धरणाला मिळणार आहे.
बहुप्रतिक्षित सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मोदी यांच्या वाढदिवसाच्याच दिवसाचा मुहूर्त साधून हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पाण्याचा स्रेत पुरेशा प्रमाणात नसेल तर कोणत्याही ठिकाणच्या विकासाला खीळ बसते. मी मुख्यमंत्री असताना हे सर्व पाहिले आहे. इथे सीमेवरच्या जवानांनादेखील पाण्याची समस्या भेडसावत होती. आता नर्मदेचे पाणी सीमेपर्यंत जवानांसाठी घेऊन आलो आहोत, असेही मोदी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीचे स्मरण केले. आज जर सरदार वल्लभभाई पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर हे धरण ६०-७० च्या दशकातच पूर्ण झाले असते, असे मोदी म्हणाले. हे धरण इंजिनीअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे त्यांनी सांगितले.
जगातील सर्वात मोठे दुसरे धरण!
जगातील दुसरे सर्वात मोठे दुसरे धरण आहे. सरदार सरोवर प्रकल्पाची मूळ उंची १२१.९२ मीटर होती. ती १३८ मीटपर्यंत वाढविण्यासाठी जून २०१६ पासून प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचा आदेश नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने दिला होता. उंची वाढविल्यामुळे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता सध्या १.२७ दशलक्ष घनमीटरवरून ४.७३ दशलक्ष घनमीटरपयर्ंत वाढली आहे. या प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरीही उपकालवे आणि काही किरकोळ कामे अद्याप बाकी आहेत.
मेधा पाटकर यांचे आंदोलन!
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी या प्रकल्पाविरोधात ४० महिलांसह बार्डा (जि. बरवानी, मध्य प्रदेश) येथे शनिवारी जलसत्याग्रह आंदोलन केले. सरदार सरोवर प्रकल्पात कमाल पाणीसाठा राहावा, यासाठी राज्यातील नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून राज्य सरकारने इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर धरणांतून पाणी सोडल्याचा आरोप पाटकर यांनी केला. बार्गी आणि तवा या दोन्ही प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा नाही. असे असतानाही केवळ रविवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यावेळी सरदार सरोवरात कमाल पाणी राहावे यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी, बरवानी जिल्ह्यात फुगवटा निर्माण होऊन अनेक गावे पाण्याखाली जातील. या ठिकाणी अद्यापही मोबदला देण्यात आलेला नाही, असे पाटकर म्हणाल्या.
मोदींना वाढदिवसाची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, रविवारी वाढदिवस आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोदींनी भरपूर प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच वाढदिवशी प्रकल्पाचे लोकार्पण ही त्यांना देण्यात आलेली वाढदिवसाची भेट मानली जात आहे.
From the land of Bapu and Sardar Patel, the Sardar Sarovar Dam is dedicated to the nation today. This will benefit crores of citizens. pic.twitter.com/gZKYbkMFPh
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2017