‘खरा सांगाचा तर बायको म्हंजे सगळा काय आसता. ती नसली की सगळाच संपता.’ बांबरवाडीच्या दत्त्या पोवाराने संसारातील फार मोठी गोष्ट सांगितली. ‘आपल्या सुखदु:खात जवळ आसता ती बायकोच! आव्स नाय.’ बायकोच्या सांगण्यावरून स्वत:च्या आईला वेगळं करणा-या शिवा गिरकरानेही मौलिक सल्ला दिला.
‘तन-मन-धन अर्पूचे गोष्टी सगळेच करतंत. पन ख-या अर्थी सोताची बायकोच तन-मन-धन देता.’ बायकोच्या जीवावर घरखर्च चालविणा-या नाम्या गोसाव्याने ‘बायको’ या प्राण्याचे गुणगान गाईले.
बबन्याच्या हॉटेलात दत्त्या पोवार, विश्वनाथ, बापू दांडेकर, शिवा गिरकर, नाम्या गोसावी वगैरे मंडळी मन्या पावसकराला सुखी संसाराचे डोस देत होते. गरीब बिचारा मन्या सर्वाचे निमूटपणे ऐकून घेत होता.
मन्याची एकुलती एक बायको रागाने माहेरी जावून आज दोन महिने झाले होते. स्वत:हून ती काही परत येत नव्हती आणि स्वाभिमानी मन्या तिला स्वत:हून माघारी बोलावत नव्हता.
एकंदर हय़ा प्रकाराने तो भयंकर दु:खी होता. दारूला स्पर्श न करणारा मन्या या दोन महिन्यांत अक्षरश: दारूला कवटाळून बसला होता. मन्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण झालं, त्याला फारसं मोठं कारण नव्हतं. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा कुत्र्या-मांजरात रमणारा मन्या बायकोत रमू लागला. म्हणून काही घरातली आठ मांजरं, सहा बोके, पाच कुत्रे आणि दोन कुत्रींना त्याने लग्न झाल्यावरही वा-यावर सोडलं नाही.
दोन महिन्यांपूर्वी जेव्हा बायकोच्या माहेराहून कुणी एक नातेवाईक आला तेव्हा जेवताना त्या नातेवाइकाच्या ताटात तिने एक उकडलेले अंडे घातलं. ही गोष्ट त्याचवेळी मन्याला खटकली. पण त्यावेळी तो मूग गिळून गप्प राहिला. खरं तर तेव्हा जेवणात मुगाचीच भाजी होती. नेहमी पाळलेल्या सात कुत्र्यांना हाडतूड करणा-या बायकोने आपल्या ताटात अंडे न वाढता माहेरच्या कुत्र्याला अंडे वाढले ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली.
नेमकं त्याचवेळी एका बोक्याने पाहुण्याच्या ताटात तोंड घातलं. हे पाहिल्यावर मन्याच्या बायकोने बाजूचा लाकडी पाट त्या बोक्याच्या डोक्यात घातला. बोका जागच्या जागी तडफडून मेला. मनाविरुध्द झालेल्या या दोन्ही घटनेने मन्याचा पारा चढला. भरलेला तांब्या त्याने बायकोच्या दिशेने भिरकावला. माहेरच्या माणसासमोर नव-याने मारहाण केली ही गोष्ट कुठली स्वाभिमानी बाई सहन करणार? त्यामुळे तिने तोंड सोडलं.
तिने तोंड सोडल्यावर मन्यानेही आपला हात सोडला. त्याच्या हाताची आणि तिच्या तोंडाची गाठभेट झाल्यावर वातावरण भयंकर तापलं. पाहुणा जेवण टाकून मध्ये सोडवायला गेला तेव्हा मन्याने त्याच्या हाताचा कडकडून चावा घेतला. ‘कुत्र्याच्या संगतीत ऱ्हवान तुमका पन कुत्र्यासारकी सवय लागली हा’ हे तिचे वाक्य ऐकताच मन्यातला पशू (की कुत्रा?) जागा झाला आणि दहा बाय बाराच्या खोलीत रणकंदन माजलं.
‘बास झाला. आता माका हय़ां घरात याक मिनिट पन ऱ्हवाचा नाया. अंत्या, आताच्या आता मी तुज्यावांगडा माहेराक येतंय.’ असं म्हणून तिने आपले हाताला मिळेल ते कपडे गोळा केले आणि अंत्या नावाच्या पाहुण्याबरोबर ती घराबाहेर पडली. सहा महिन्यांतच मन्या पावसकराचा संसार मोडून पडला.
भरल्या डोळय़ाने मन्याने तातूच्या हॉटेलात आपला संसार मोडणारी हकिगत सगळय़ांना ऐकवली तेव्हा एकजात सगळेच हळहळले.
‘मन्या, झाला ता लयच वाय्ट झाला. पन तुका कवाट न वाढता पावन्याच्या ताटात कवाट वाढल्यान त्येच्यात माका तरी काय गैर वाटना नाय. म्हणान बोक्याच्या डोक्यात पाट घालान त्येका ठार मारल्यान म्हंजे तुज्या बायकोचाव काय चुकला नाय असा माका म्हणाचा नाया. पन शेवटी नवरा-बायकोची भांडणा ती! पेल्यातला वादाळ पेल्यातच ऱ्हवाक व्हया. ता भाय्र पडता नये.’ विश्वनाथाने मन्याला समजावलं.
‘पन इशा, पेल्यातला वादळ तेनीच ताटात हाडल्यान. मी नाय.’ मन्याने आपली बाजू मांडली.
‘खरा सांगू मन्या, सगळय़ाच घरात नवरा-बायकोची भांडणा होतत. म्हणान सगळय़ांचेच सौसार मोडत नाय. आता माज्या घरात काय येगळा हा? अदी-मदी मी बायकोक मारतंय. कदी ती त्येची परतफेड करता.’ नाम्या गोसाव्याचा स्वानुभव बोलला.
‘घर दोघांचं असतं. दोघांनी सावरायचं असतं. एकाने उधळलं तर दुस-याने आवरायचं असतं.’ कधीतरी वाचनात आलेली चंद्रशेखर गोखलेंची चारोळी विश्वनाथाने मन्याच्या तोंडावर फेकली.
‘म्हंजे इशा, तुका असा म्हणाचा हा की, मी बायकोच्या पाया पडायचा!’ मन्याने तावातावाने विचारलं.
‘नाय नाय, तुजो कायतरी गैरसमज झालो हा. माका असा म्हणाचा नाया. पन शेवटी कायतरी अॅडजेस्टमेंट ही करूकच व्हयी.’
‘पन ती मी कित्या करू? माका काय गरज हा?’
‘कारण तू घरचो कुटुंबप्रमुख आसस. घर तुका टिकव्न ठेव्क व्हया. आणि हय़ेंच्यात काय कमीपणा वाटान घेव नूको. आज तू तरुण आसस. तुका सुद्धा भावना हत. बायकोक मारहाण करून ती रागान निघान गेली असा कोणाक कळला तर परत तुका कोण पोरगी देवचो नाय. त्येच्यामुळा हा त्येच्यात कायतरी अॅडजेस्टमेंट करूकच व्हयी.’ विश्वनाथाने मनापासून त्याला समजावलं.
‘ता कायव आसांदे! पन मी त्येका बोलव्क सासरवाडीक जावचंय नाय.’ मन्याने साफ सांगून टाकलं.
‘तिच्या दारात जाव्क तुका कोण सांगता? आपन तिका निरोप पाठवया.’
‘निरोप कित्या? घरात फोन आसा तिच्या.’ विश्वनाथाच्या एकंदर बोलण्याने मन्याला सुद्धा आता बायकोची खरोखरच गरज वाटू लागली.
‘अरे मग येळ कित्या? आताच्या आता फोन लावया. माज्या मोबाय्लवरसूनच लावतंय.’ विश्वनाथाने जोर धरला.
‘व्हय. चांगल्या गोष्टीक येळ नूको. एकाद्याचो मोडलेलो सौसार जोडणा म्हंजे पूण्य हा.’ पापी शिवाने पुण्याची गोष्ट केली. सगळय़ांनी जोर धरल्यावर विश्वनाथाने मन्याच्या बायकोला फोन लावला. रिंग वाजल्यावर त्याने मन्याकडे मोबाईल दिला. पलीकडून त्याच्या बायकोनेच फोन उचलला. मन्या बोलू लागला,
‘शेवत्या, मी मन्या बोलतंय. मी काय सांगतंय ता नीट आयकान घी. तू आसस त्या अवस्थेत इकडे निघान ये. नायतर आयुष्यभर तुका घरात घेवचंय नाय.’ मन्याने जबरदस्त तंबी दिल्यानंतर आता मन्याची बायको काय उत्तर देते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिलं. पलीकडून त्याच्या बायकोने शांतपणे उत्तर दिलं,
‘तुमी म्हणत असशाल तर माजी येव्क कायच हरकत नाया. पन आता आसय त्या अवस्थेत इलंय तर आमका दोघांकाव घरात घेशाल?’ बायकोच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने मन्या जागच्या जागी थिजून गेला. मन्याची ती अवस्था बघून बाकीचे सर्व जण बुचकळय़ात पडले. पण मन्याची बायको नक्की काय बोलली ते शेवटपर्यंत कुणालाच कळलं नाही.