माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ विकास पॅनलने ग्रामपंचायत निवडणुकीत मिळविलेले यश व घेतलेली विजयी घोडदौड यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.
सावंतवाडी- माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ विकास पॅनलने ग्रामपंचायत निवडणुकीत मिळविलेले यश व घेतलेली विजयी घोडदौड यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. सावंतवाडी तालुक्यात बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांनी राणे साहेबांची भेट घेवून आपण समर्थ पॅनलचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधकांनी उगाच जनतेची दिशाभूल करू नये. तेलींचे कर्तृत्व काय आहे ते यापूर्वी झालेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जतनेने पाहिले आहे.
त्यामुळे या निवडणुकीतही सावंतवाडीकर कणकवलीतील हे पार्सल नाकारतील असे सांगतानाच विक्रांत सावंत म्हणजे, ‘बालिश बहु बायकात बडबडला’ अशी स्थिती आहे. त्यांचे वय राजकारणाचे नसून विटीदांडू खेळण्याचे आहे. त्यामुळे माजगावातील सेनेच्या पराभवानंतर त्यांना विटीदांडू भेट देईन, अशा शब्दांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत तेली व सावंत यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
त्यांनी सेना व भाजपकडून केवळ जतनेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे,. हे दोन्ही पक्ष मिळून देखील आमची बरोबरी करू शकणार नाही. सेना तर तालुक्यात दुहेरी आकडाही गाठू शकणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक उदय नाईक, जि.प.सदस्या उन्नती धुरी, केतन आजगांवकर आदी उपस्थित होते. खरं तर विक्रांत सावंत यांच्या वक्तव्याची दखल घेणे उचित नाही. मात्र, राणे साहेबांवर झालेली टीका आम्ही सहन करणार नाही. आजोबांच्या पुण्याईवर राजकारणात यश मिळत नाही. शेतक-याने लावलेल्या झाडाला आलेली फळे नातू चाखतात. मात्र, राजकारणात तसे चालत नाही. त्यासाठी जनतेत जावं लागतं, समाजकार्य करावं लागत. दहा हजारांचा शर्ट व वीस हजारांचे शूज घालून इस्त्रीच्या कपडय़ांनी राजकारण होत नाहीत. सावंत यांनी खरं तर राजकारणात आपलं करिअर फुकट घालविण्यापेक्षा रितेश देशमुखप्रमाणे सिनेसृष्टीत जावं, असा उपरोधिक सल्लाही यावेळी संजू परब यांनी दिला. सावंत यांच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक असलेल्या व समर्थ विकास पॅनलमधून मडुरा
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणा-या २ उमेदवारांना सावंत यांनी नोकरीवरून काढून टाकले. त्यांच्या पोटावर लाथ मारली. हीच यांची संस्कृती का? असा सवालही यावेळी संजू परब यांनी उपस्थित केला. विधानसभा मतदारसंघात सोडाच पण सावंत यांच्या माजगाव गावातही समर्थ विकास पॅनलचाच विजय निश्चित आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांच्या माध्यमातून केलेली विकासकामे जनतेसमोर आहेत. सावंत हे खासदार, आमदारांची नावे सांगत आहेत. मात्र, माजगावात त्यांच्या माध्यमातून किती निधी खर्च केला हे त्यांनी जाहीर करावं. सावंतवाडी तालुक्यात भाजप यशाच्या गप्पा कोणाच्या आधारावर करत आहे. आजही भाजपला कणकवलीतील पार्सल बोलण्यासाठी निमंत्रित करावं लागतं. सावंतवाडीत येऊन राजकारण करणा-या तेलींनी आजवर केवळ इकडच्या लोणी तुपावरच डल्ला मारला.
त्यामुळे कुठल्या गावातील कोण सरपंच, कोणत्या पक्षाचा निवडून आला हे त्यांना कसे कळणार? बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सरपंचांनी स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यामुळे वेगळा पुरावा देण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही किती गावात पॅनल उभे केले याचे उत्तर निकाला दिवशी मिळेल. त्यामुळे तेलींनी ती काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाला किमान यश मिळण्यासाठी तरी प्रयत्न करावा, असा सल्ला दिला. विकासाच्या बाबतीत स्थानिक खासदार, पालकमंत्री हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जनतेने आपल्या गावच्या विकासासाठी समर्थ विकास पॅनललाच मतदार करून विकासाचा प्रवाह अखंडित ठेवावा, असे आवाहनही संजू परब यांनी केले.
[EPSB]
कच-याच्या ढिगा-याला कंटाळून महानोरांनी राहते घर सोडले!
ज्या माणसाने महाराष्ट्राला अजरामर कविता दिल्या, ज्या माणसाने माणसाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले, त्याच माणसाला आज आपले घर सोडावे लागले आहे.
[/EPSB]