खरं म्हणजे संजय मोनेंसारख्या प्रथितयश अभिनेता, लेखकांबाबत अशी ‘भेटला’ वगैरेसारखी भाषा वापरणं असभ्यपणाचं आहे. पण त्यांची आणि माझी भेट इतकी अचानक आणि मस्त झाली की त्याची आठवण आजही माझ्या मनातून जायला तयार नाही. त्याचं काय झालं ! सकाळी साडेसात पावणेआठची वेळ.
मारुती मंदिरच्या वायंगणकर हॉटेलसमोर आम्ही (म्हणजे मी आणि एक मित्र) गप्पा मारीत होतो. बोलताबोलता समोरून येणारा हाफ पॅन्ट, टी-शर्ट घातलेला माणूस माझ्या काहीसा ओळखीचा वाटला म्हणून मी त्याच्याकडे पुन्हा पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, हे संजय मोने. पण मी काही वेगळी प्रतिक्रिया न देता, त्या मित्राशी चालू असलेलं बोलणं तसंच चालू ठेवलं. पण तेवढयातच दुरून येणारे संजय मोने माझ्या त्या मित्राने म्हणजे अविनाश वासुदेव याने पाहिले आणि तो भारावल्या स्वरात म्हणाला, ‘अरे, संजय मोने’! भरभर चालत येऊन संजय मोने आमच्यापर्यंत पोहाचले आणि अविनाश वासुदेव यांनी केलेल्या नमस्काराचा किंचित हसून स्वीकार करीत आम्ही उभे होतो त्या हॉटेलमध्ये शिरले.
तेवढयात कुजबुजत्या आवाजात मला कळावं म्हणून म्हणाला, ‘संजय मोने’. मी आवाजात मुद्दाम निर्विकारपणा आणत म्हटलं, ‘आलं लक्षात.!’ त्याला आश्चर्य वाटलं. काही क्षण तो गप्प झाला आणि पुन्हा अधीरपणे विचारता झाला, ‘तू त्यांना भेटायला नाही जाणार?’ मी आवाज स्थिर राखत म्हटलं, ‘नाही!’ त्याच्या चेह-यावर संमिश्र भाव उमटले. पण तो मला पुन्हा काही विचारणार इतक्यात, संजय मोने जाण्यासाठी हॉटेलबाहेर पडले.
वासुदेव नी त्यांना पुन्हा हसून नमस्कार केला, आणि दोन पावलं पूढे गेलेले संजय मोने मागे वळत थांबले, आम्हा दोघांजवळ आले आणि वासुदेवांच्या नमस्काराला, डोळे, नाक आणि ओठ यांच्या एकाचवेळी असंख्य हालचाली करत, ठळक मोठया आवाजात ‘नमस्कार’ असं म्हणत प्रतिनमस्कार केला. पहिल्यांदा आमची नावं विचारली आणि मग आपलं नांव सांगितलं. ‘नावं विचारली’ हे मी मुद्दामहून तुम्हाला सांगितलं, कारण माझं एक असं अनुमान आहे की, नको असलेली माणसं अचानकपणे आपल्याला चिकटली की, बहुदा आपण त्याचं नांव वगैरे विचारायच्या भानगडीत न पडता, काहीतरी जुजबी बोलून आपण फुटतो किंवा त्याला फुटवतो, पण त्यानी तसं केलं नाही.
अविनाशच्या वासुदेव या आडनांवानी त्याचं कुतुहल जागृत झालं असावं म्हणून त्यांनी खात्री करून घेण्याकरीता विचारलं, ‘अविनाश वासुदेव म्हणजे?’ त्यावर अविनाश म्हणाले, ‘वासुदेव आडनांव’ त्यावर मोनें उत्साही सुरात म्हणाले, ‘म्हणजे तुम्ही मुंबईकर!’ हे ऐकल्यावर वासुदेवांचा चेहरा खरोखरीच फुलून आला आणि मग काहीवेळ, एकाच गावच्या माहेरवाशिणी बरेच दिवसानंतर भेटल्यानंतर जेवढया प्रेमानं गावाविषयी गप्पा मारतात तेवढया प्रेमानं त्या दोघांच्या मुंबई आणि विशेषत: गिरगांव याविषयी काहीवेळ गप्पा झाल्या.
त्यांनी आमच्याबरोबर अशाच काहीवेळ इकडच्यतिकडच्या गप्पा मारल्या आणि निरोप घेत जितक्या भराभर चालत आले होते तितक्याच भराभर निघून गेले. तुम्ही हे वाचल्यावर म्हणाल, यात काय नवल? आणि ते खरंही आहे, कारण अशी सेलेब्रेटी तुम्हालाही कधीतरी भेटली असेलच. याची कल्पना असूनही, हे सगळं इतक्या पाल्हाळीकपणे तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे, संजय मोने तिथून निघून गेल्यानंतर काही वेळांनी दोन गोष्टी मला अचानकपणे जाणवल्या, पहिलं म्हणजे,सगळया गप्पांमध्ये मोने, ‘मी’, आणि ‘माझं’, याविषयी काहीच बोलले नव्हते.
खरंतर प्रसिध्दीच्या क्षेत्रामधली माणसं, तसं बोलताना कधीच थकत नाहीत, असा आपला अनुभव असतो आणि दुसरं, मोनेंना पहिल्यानंतर, त्यांच्यविषयी अविनाश वासुदेवांनी दाखविला तेवढा आत्मिक स्वागतभाव न दाखविता मी, त्यांना ओळख न दाख्विण्याचा शिष्टपणा केला होता.
मोने आत हॉटेलमध्ये असताना, अविनाश वासुदेवनी मला विचारलं, ‘तू भेटायला नाही जाणार त्यांना?’ त्यावर मी ‘नाही’ म्हटलं याचं आश्चर्य वाटून त्यांनी विचारलं ‘का’? मी पटकन् म्हटलं, उगाच त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करणं मला आवडत नाही. आणि हे कहिसं खरंही आहे. कारण ब-याच प्रसिध्द व्यक्ती कारण नसताना लोकांमध्ये मिसळत नाहीत किंवा विनाकारण त्यांच्याजवळ गेलेलं बहुतेकांना आवडतही नाही. विशेषत: नट म्हणून प्रसिध्द असलेली मंडळी आपला अलिप्तपणा अधिकपणे जपतात, कदाचित ती त्यांची व्यावसायिक गरज आणि आवश्यकता असते, असा माझा समज आहे.
पण म्हणूनच या पार्श्वभूमीवर मोनेंच्या मनाचा मोठेपणा आणि मोकळेपणा मला जाणवत राहिला आणि वेगळा अनुभव देणारा ठरला. हे सगळं वाचल्यानंतर, कोणाच्याही मनात एक प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे, ‘बरं मग पुढे’? यात नवीन असं काय आहे? सांगतो! मी सध्या गिरीश कार्नांडांचं ‘खेळता खेळता आयुष्य’ ही आत्मकथा वाचतोय. जगप्रसिध्द असे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक. त्यांनी हिंदी,मराठी आणि कन्नड रंगभूमी आणि सिनेमा यांनी आपल्या प्रतिभेने गाजवला आहे, हे आपणा सर्वांनाच महित आहे.
ययाती, नागमंडल, हयवदन, तुघलक यासारखी एकसोएक १४, १५ नाटकं, असंख्यात दर्जेदार सिनेमे आणि सिरीयल्स. त्यांच्या या पर्वतायेवढया कर्तृत्वामुळे त्यांना पद्मश्री आणि पद्मभुषण पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची आत्मकथा वाचता वाचता, मला हेही कळलं, कर्नाड गणित, स्टॅटिस्टीक या विषयांचे पदवीधर आहेत आणि सन्मानाची अशी Rhodes Scholership मिळवून त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्र्हसिटीमध्ये तर्कशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला आहे. हे सगळं नुसतं वाचूनच छाती दडपून जाते. सेकंड क्लास मिळाला तरी हुरळून जाणारा आणि राज्य नाटय़च्या प्राथमिक फेरीतल्या यशानं फुगून जाणा-या माझ्यासारख्याला हे कर्तृत्व खरंच कल्पनेपलीकडलं असतं,आहे. मला हे सगळं विचार करायला पुन्हा पुन्हा भाग पाडतं.
संजय मोनेंच्या भेटीवेळया माझ्या भुमिकेविषयी मी तुमच्याशी अर्धवट खरं बोललो. संपूर्ण खरं हे आहे की, संजय मोनेंना ओळख न दाखविण्यामध्ये, मी केवळ त्यांच्या प्रायव्हसीचा विचार केला नव्हता तर, मी कशाला त्यांना ओळख दाखवू? हा अहंभाव त्यामध्ये जास्त होता. माझ्या नमस्काराकडे त्यांनी कदाचित दुर्लक्ष केलं असतं तरी असा माझा अपमान व्हायला मी येवढा मोठा कोण लागून गेलो आहे? हा प्रश्न संजय मोने आमच्याशी मित्रत्वाने गप्पा मारून गेल्यानंतर माझ्या मनाने मला पुन्हा पुन्हा विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा धीटपणा मला झाला नाही.
नुकतंच वाचलेलं गिरीश कार्नांडाचं कर्तृत्व मला पुन्हा पुन्हा खुणवीत राहीलं आणि वाटलं, अशा माणसांच्या कर्तृत्वापुढे, अहो ‘टीचभर’ हा शब्दसुद्धा प्रचंड मोठा ठरावा येवढंसं कर्तृत्व आपलं, पण पदोपदी केवढा ‘मी’ पणा दाखवितो आपण! हे मला पुन:पुन: जाणवत राहील. खरंतर ही गोष्ट मोनेंची नाही माझीच आहे. माझ्या निर्थ अहंभावाची. संजय मोने आपल्या वागणुकीमधून एखाद्या मित्राच्या नात्यानं मला हे सगळं अभावीतपणे पुन्हा समजावून गेल. आणि म्हणूनच लेख लिहिण्यापूर्वी त्या आपुलकीतूनच हे शिर्षक आधी लिहीलं, ‘संजय मोने भेटला त्याची गोष्ट’.