राज्यातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी केला असून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई- राज्यातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी केला असून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरा टप्पा राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून सुरु होणार आहे. या यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे. सुरुवातीला शिवसेनेचे सदस्यही विरोधी पक्षांच्या सोबत होते.
शेतक-यांना कर्जमाफी दिली नाही, तर अर्थसंकल्प सादर करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र पुढे शिवसेनेने माघार घेतली. अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कर्जमाफीच्या घोषणा दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्या दिवशीपासून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहातील कामकाजावर विधानसभेत बहिष्कार घातला होता.
सरकार सभागृहात न्याय देत नसल्यामुळे हा प्रश्न जनतेच्या न्यायालयातच मांडायचा निर्णय घेऊन चांदा ते बांधा अशी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. शनिवारी या संघर्ष यात्रेचा समारोप पनवेल येथे झाला. अधिवेशन संपतांना तरी सरकार काही सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा होती.
मात्र तसा सरकारने निर्णय घेतला नाही. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने तेथील शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केल्याने विरोधक आता अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता जोपर्यंत शेतक-याला कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतला आहे.
शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा भाग म्हणून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या लढय़ाची दिशा ठविण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लीकन पक्ष या सर्व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. दुस-या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, आणि पालघर जिलतून जाणार आहे. बैठकीत यात्रेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यात आला.