विविध मागण्यांबरोबरच मानधन नको वेतन हवे अशी प्रमुख मागणी घेऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते.
देवरूख- विविध मागण्यांबरोबरच मानधन नको वेतन हवे अशी प्रमुख मागणी घेऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मध्यस्थी करून सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन वाढ हा पर्याय काढून याबाबत अंमलबजावणीची ग्वाही दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यामुळे तब्बल १ महिन्यानंतर सोमवारी संगमेश्वर तालुक्यातील ३८० अंगणवाडय़ा बालकांच्या उपस्थितीत पुन्हा गजबजल्या आहेत.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या राज्य संघटनेने राज्य शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करताना मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आंदोलनाची भूमिका समजून घेऊन तुटपुंजे मानधन वाढवण्याची ग्वाही दिली. मात्र या १ हजार रुपये वाढीला अंगणवाडी सेविका संघटनेने नापसंती दर्शवून ९ सप्टेंबरपासून बेमुदत अंगणवाडी बंदचे आंदोलन सुरू केले.
काम बंद आंदोलन सुरू होताच कुपोषित व नियमित बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला. आंदोलन सुरू झाल्यानंतरही शासन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू लागले. परिसरातील कार्यरत असलेल्या आशा घटकांना अंगणवाडय़ा सुरू करून बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न
मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यानंतर हे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन तीव्र झाले. संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी २ वेळा आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. दोन वेळा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन तीव्र होत असल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ जाहीर करून याची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्यापासून केली जाईल असे सांगितले.
यामुळे राज्य संघटना काही अंशी आनंदित होऊन सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले व ९ ऑक्टोबरपासून अंगणवाडय़ा उघडल्या जातील असे संघटनेने जाहीर के ले. मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर केलेले मानधन प्रत्यक्षात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मान्य नाही. मात्र संघटनेच्या निर्णयाला बांधील राहून नाराजीने अंगणवाडय़ा सोमवारपासून उघडण्यात आल्या. तालुक्यातील २८७ अंगणवाडी व ९३ मिनीअंगणवाडय़ा सोमवारपासून बालकांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहेत. तब्बल १ महिन्यानंतर बालकांनी सोमवारी पोषण आहाराचा आनंद लुटला.
[EPSB]
जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी ६१ ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या असून २९ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
[/EPSB]