देशात लोकसंख्या वाढीला हिंदू नव्हे तर चार बायका आणि चाळीस मुले असलेलेच जबाबदार आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले.
मेरठ- सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले भारतीय जनता पक्षाचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज हे लोकसंख्या वाढीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा चर्चेत आले आहेत. देशात लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. याला हिंदू नव्हे तर चार बायका आणि चाळीस मुले असलेलेच जबाबदार आहेत, असा आरोप साक्षी महाराज यांनी केला. मेरठमध्ये शुक्रवारी झालेल्या संत संमेलनात त्यांनी हे वक्तव्य केले.
देशात लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे यावर विचार करणे आवश्यक आहे. स्त्रीया केवळ मुले जन्माला घालणा-या मशीन नसून त्यांचा आदर होणे आवश्यक असल्याचे साक्षी महाराज म्हणाले.
दरम्यान, साक्षी महाराज यांनी एका विशिष्ट समाजावर टिका केली आहे. साक्षी महाराजांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करत हे वक्तव्य केले आहे. धर्माच्या नावाखाली पक्षाने मते मागणे बेकायदा असल्याचे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे साक्षी महाराज यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या निलंबनाची मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आश्वासनावरून लक्ष्य विचलीत करण्यासाठी भाजपचे नेते अशी विधाने करत आहेत. पक्षातून त्यांचे निलंबन करण्यात यावे आणि संसदेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी उत्तर प्रदेशष काँग्रेसचे नेते अखिलेश सिंह यांनी केली आहे. तर साक्षी महाराजांचे हे वक्तव्य आचासंहितेचा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करणारे असल्याने आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे काँग्रेस नेते के. सी. मित्तल यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर साक्षी महाराज यांनी एका विशिष्ठ धर्माविरुध्द वक्तव्य करण्याचा हा पहिला गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांनी केली आहे.
भाजपाने मात्र सावध पवित्रा घेत या प्रकरणात हात वर केले असून हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोग आता त्यांच्यावर काय कारवाई करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.