पाणी ही सजीवाला आवश्यक असणारी बाब आहे. पाण्याशिवाय सजीव ही संकल्पना करवत नाही. शाक्य व कोलीव यांच्यातील रोहिणी नदीचा पाणीवाटपाचा तंटा गौतम बुद्ध यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. अशी पाण्याची ‘पाणी’दार कथा आहे.
पाणी ही सजीवाला आवश्यक असणारी बाब आहे. पाण्याशिवाय सजीव ही संकल्पना करवत नाही. शाक्य व कोलीव यांच्यातील रोहिणी नदीचा पाणीवाटपाचा तंटा गौतम बुद्ध यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. अशी पाण्याची ‘पाणी’दार कथा आहे. या कथेची उजळणी करण्याचे निमित्त ठरले आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे.
आंध्र प्रदेशाच्या फेररचनेनंतर होणा-या कृष्णा नदीच्या पाणीवाटपात महाराष्ट्राच्या हिश्शाचेही पाणी मिळावे, अशी मागणी तेलंगणची आहे. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावल्यानंतर या न्यायालयाला तेलंगणची याचिका फेटाळावी लागली. शिवाय कृष्णेच्या पाण्यावर महाराष्ट्राचाच हक्क असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा निकाल पाण्यासाठी भांडणा-या राज्यांसाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर २०१४ मध्ये आंध्र प्रदेश फेररचना कायदा अस्तित्वात आला. तेलंगणच्या निर्मितीनंतर पाणीवाटपाचा मुद्दा आला तेव्हा एकत्रित आंध्रच्या वाटयाचे १००५ टीएमसी पाणी या दोन्ही राज्यांनी परस्परात वाटून घ्यावे, असे राष्ट्रीय पाणी लवादाचा नियम सांगत असताना तेलंगणने या पाणीतंटयात महाराष्ट्रासह कर्नाटकलाही ओढले. त्यामुळे हे पाणी कायद्याने आपल्याला मिळावे यासाठी तेलंगण सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण या न्यायालयाने ही याचिकाच फेटाळून लावल्याने महाराष्ट्राला त्याच्या वाटयाचे ६६६ दशलक्ष घनफूट पाणी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालामुळे पाण्यासाठी भांडणा-या राज्यांना चपराक बसणार आहे. विशेषत: आंध्रला. कारण या राज्यातूनच तेलंगणची निर्मिती झालेली आहे. कावेरी पाणीवाटपाचा तंटाही असाच जुना असून तामिळनाडू व कर्नाटकातील हा तंटा अठराव्या शतकापासून आहे. या तंटयावरही तोडगा निघण्याची आवश्यकता आहे. नदीला किंवा पाण्याला कोणतीही सीमा नसते. ते बिनधास्तपणे वाहत असते. त्यामुळेच की काय चीन, ब्रम्हदेशला वळसा घालून ब्रम्हपुत्रा नदी भारतातील अनेक राज्यातून वाहते. त्या भागातील प्रदेश सुपीक करते. असे असताना चीनने जर ही नदी अडवण्याचा प्रयत्न केल्यास किती मोठा गहजब माजेल.
सजीवांसाठी गरजेच्या असलेल्या पाण्यासाठी तंटे-बखेडे उभे करून हा प्रश्न मिटणार नाही. पाण्याच्या समन्यायी वाटपाचा प्रश्न समजुतीने मिटवला जाणे आवश्यक आहे. त्यातच मानवजातीचे कल्याण आहे. अन्यथा पाण्यासाठी डोकी फुटतच राहतील. त्यातून साध्य काहीच होणार नाही.