सुभद्राताईंच्या श्रीरामाला रोज नवा प्रसाद लागे. फुलांचे विकतचे हार चालत नसत. रोज ताजी फुले आणा मग त्याचे हार गुंफा! ते काम नोकरांनी केलेले कसे चालते? पॉइंट होता ना!
‘आम्ही गावाला गेलो तरी सुभद्राबाई येतायत ना? राघवची त्या व्यवस्थित काळजी घेतील. तू निश्चिंत मनानं जाऊ शकशील बरं नलू हॉस्पिटलला.’ राघवची नानी सोलापूरला परत निघाली होती, कारण नलूची धाकटी बहीण शिलू हिची बाळंतपणाची वेळ जवळ येऊन ठेपली होती. नलू डॉक्टर नि शिलू फिजिओथेरेपिस्ट अशी जोडी होती बहिणींची. राघवची नानी म्हणजे सुमती मानकर.
सुमती आणि नारायण मानकर ही जोडी कायम मुलींच्या उपयोगी पडण्यासाठी तत्पर असत. राघव पाच वर्षाचा होईपर्यंत नलूला त्यांनी साथ दिली. मधे शिलूचे लग्न गावीच ठरले तेव्हा वर्षभर चिमण्या राघवला नाना -नानी घेऊन गेले होते. नलूला तोषिस नव्हती नि चिंताही नव्हती. आता मात्र शिलूचं बाळ सांभाळायला दुक्कल सोलापूरला निघाली होती.
‘मी आई-बाबांना बोलावतो.’ दुर्गेश- राघवचा बाबा म्हणाला.
ठीक आहे. नि असे नलूचे सासू-सासरे नलूकडे दाखल झाले. सुभद्राताई आणि कृष्णराव म्हणजे भक्तीचा लोट-पोट अगदी. ओठी-पोटी- हृदयी-श्रीराम-जयराम-जय जय राम! दुर्गेशचे आई-बाबा आले म्हणजे सोबत देव घेऊन येणार. सारं कसं प्रत्येकाच्या आवडी जपत जगतात लोक.
जेव्हा तीन पिढय़ांना एकत्र नांदायचे असते, तेव्हा मग ‘जगा आणि जगू द्या’ हीच उपाययोजना अमलात आणावी लागते ना! नलूनेही तो भक्तीचा मळा शिंपायला तिच्या घरात दुर्गेशच्या आई नि वडिलांना परवानगी दिली.
दुग्रेश पडला कलावंत माणूस. त्याच्या चित्रीकरणाच्या वेळा अनियमित असत. ठिकाणे वेगवेगळी असत. त्यात मधूनमधून तो नाटय़प्रयोगही करीत असे आणि नलू हॉस्पिटलात प्रसूतीतज्ज्ञ म्हणून सतत व्यस्त असे. बाळंतपणे ठरल्यावेळी होतात थोडीच? ‘त्या कळा’ कधीही सुरू होतात ना! मग नलू एखाद्या मधमाशीसारखी सदैव बिझी! उद्योगप्रवण! बिझी बी!
सुभद्राताईंनी राघवचा ताबा क्षणार्धात घेतला. त्यांची उबदार दाट मायेची मिठी राघवला सुखावून गेली. आज्जोचा चष्मा त्याने घातला नि आईला म्हणाला, ‘आई तू कसली फॅटू दिसतेस या चष्म्यातून!’ दुर्गेश एकदम ताणरहित झाला. चला! प्रश्न मिटला. नाना-नानी परत सोलापूरला गेले..
आता राघवचं कसं होणार? राघवला नोकर-चाकरांवर सोपवून जावे लागणार नाही. संस्कार उत्तम होत राहतील. तोंडात असभ्य भाषेचा शिरकाव होणार नाही. आता आपण रंगदेवतेची सेवा करायला मनमुक्त! नलूलाही काळजी नाही.
‘तुम्हाला सारे देव घेऊन इथे यावे लागले.’ ती सासूला म्हणाली.
‘अगं त्यात काय एवढं? माझ्या देवांना तुझं घर आवडलं बरं!’
त्या अगदी मनापासून बोलल्या.
‘चांगली गायनॅक बहीण असताना शिलू मुंबैत आली नाही बरं बाळंत व्हायला. आई-बाबाही होते. मी आग्रह केला किती वेळा. पण तिचा आपला एकच हेका! सोलापूरलाच बाळंत व्हायचंय. सोलापुरातच माझं बाळ जन्मावं अशी बाळाच्या बाबांची नि माझी इच्छाय. बाळाचे आईबाप ना ठरवतात हे तायडे.?’ मग मला तुम्हाला सांगावं लागलं. या राघवसाठी. नि तुम्ही कोणताही अनमान न करता आलात. याहून अधिक काय हवं मला नि दुर्गेशला. आय अॅम सो थँकफुल टू यू!’ सासूचा भरपूर इगो मसाज झाला ती सुखावली.
घरातले दोन्ही कर्मचारी मात्र त्रस्त झाले. कारण सुभद्राताईंच्या श्रीरामाला रोज नवा प्रसाद लागे. फुलांचे विकतचे हार चालत नसत. रोज ताजी फुले आणा मग त्याचे हार गुंफा! ते काम नोकरांनी केलेले कसे चालते? पॉइंट होता ना! पण नोकर असल्याने बोलायची शामत?
छे बाबा! ना बाबा ना! गप्प. भक्तिरसात गटांगळय़ा खा आता! करे तो भी क्या?’
दिवस काय हो? पळतच असतात.
स्वप्ने विकणारे जादूगार रोज नवी नवी नाटक-सिनेमांची जादू करीत राहतात नि मग कलाकारांना कामे मिळत राहतात. आपला दुर्गेशही मस्तपैकी व्यस्त, कामात मग्न होता.
आणि जोपर्यंत विवाहसंस्थेची चलती आहे तोपर्यंत बाळ होण्याची गलती जोडपी करतच असतात. त्यामुळे दुर्गेशची बायको नलूही दिवस रात्र कार्यमग्न होती.
दादा-दादी यानेकी आज्जो नि सुभूआजी भक्तिमय असले तरी राघव बाळाची विशेष काळजी घेत होते. त्याचे खाणे-पिणे, त्याची बालवाडी, त्याचा चिमुकला अभ्यास, त्याचे आरोग्य, विश्राम आणि खेळ अगदी टुकीने सांभाळीत होते.
थोडा समंजसपणा आणि लवचिकपणा अंगी असायला हवा प्रत्येक बाईच्या. मग सासू-सासरे तिला सहन होऊ लागतात. काटय़ावर जगत वनवासी करतात पोरं नैतर! आई-बाप दूर नि बाळं कुणाकडे? डे केअर नाहीतर बेबी सीटरकडे. मग बाळांचं खाणं बाळांनाच मिळतं ना? ही चिंताच करत बसायचं ना? आजी- आजोबा निदान असं कृष्णकृत्य तरी करणार नाहीत!’ नलू आपल्या असिस्टंट डॉक्टरना म्हणाली. त्यावर ती, म्हणजे शुभदा म्हणाली, ‘मला सांगावं की नाही असा प्रश्न पडलाय.. पण सांगतेच आता मॅडम. माझा मुलगा अर्णव आणि तुमचा मुलगा राघव एकाच शिशुवर्गात आहेत, पण राघव अलीकडे बदलला आहे. खूपच शिष्टपणे आणि कुणीतरी
विशेष असल्यासारखा, वर्गमित्रांशी वागू लागला आहे.’
नलू सटपटलीच. ही गोष्ट शुभदा आपल्यापाशी आधी का बरे बोलली नाही? आपली
असिस्टंट आहे म्हणून घाबरली? अशी अप्रिय गोष्ट मॅडमना कशी सांगणार असं वाटलं तिला?
‘काय म्हणतो तो शुभदा?’ शिष्टपणे वागतो म्हणजे काय? तो आपल्या सवंगडय़ांना तुच्छ लेखतो का?’
‘काहीसं तसंच’
‘म्हणजे?’
‘म्हणजे तो स्वत:ला श्रीरामाचा अवतार समजतो.’
‘काऽऽय?’ नलूला कापरंच भरलं.
‘वेळीच सावरा मॅडम.’ शुभदाचं बोलणं ड्रमड्रीलसारखं कानात गुंजत होतं. कामात लक्ष एकाग्र करताना त्या दिवशी खूप कष्ट पडले. घरी जाताच ती दुर्गेशला म्हणाली, ‘नशीब आज तू घरी आहेस. मला एक फॅमिली मीटिंग हवीय दुर्गेश.’
नलूनं सासू-सासरे, नवरा, मुलगा यांना आपल्या खोलीतच बोलावलं. हा विषय तिला नोकरांसमोर बोलायचा नव्हता.
‘तू काय स्वत:ला श्रीराम समजतोस राघव?’ तिने लेकरास विचारले.
‘बघ. तुला पण कळले ना?’ लेकरू मजेत होते.
‘कळले म्हणजे, तुझ्या वर्गातल्या अर्णवने त्याच्या आईला आणि तिने मला सांगितले. खरंय का?’
‘अगं सुभूआज्जीनं मला सांगितलंय. तिच्या स्वप्नात श्रीराम आले. त्यांनी सांगितलं की मी राघवच्या रूपात आहे.. हो नं गं सुभुआज्जी?’
‘होच मुळी.’ सुभद्राबाई मस्त खुशीत होत्या. दंग एकदम!
‘हे चूक आहे दुर्गेशची आई. माझा राघव माणूस आहे. देव नाही.’
ती रागावली. कापू लागली. ‘त्याचं नुकसान करताय तुम्ही असं सांगून’ तिचा आवाज असाधारण चढला, पण सासू दृढपणे म्हणाली,
‘काय गं मुली, तुला तुझं इस्पितळ मंदिर वाटतं ना? तिथले सारे पेशंट तुला देवासमान वाटतात ना? तूच म्हणतेस, सदासर्वदा.. या पेशंटाची सेवा म्हणजे ईशसेवा आणि दुर्गेश तू रे? गप्प कसा राहतोस? बाईलबुद्धय़ा! अरे प्रेक्षकांना मायबाप म्हणतोस, रंगदेवतेला ईश्वर मानतोस, पूजतोस, नमितोस नि मला ही डाफरते तर गप्प बसतोस? माझ्यासाठी माझा नातूच ईश्वर आहे. श्रीराम आहे.’
‘पण हे चूकच आहे. त्याचा असला इगो मसाज मला नकोय. मी आई आहे त्याची. तो साध्या माणसागतच वाढला पाहिजे. ही इज नॉट अवतारी पुरुष.’ नलूचा आवाज चिरकला.
‘कोण चूक नि कोण बरोबर या खूप सापेक्ष कल्पनायत नलू. तुला सांगते, मोठा झाला की कळेल त्याला तो माणूस की देवमाणूस तेव्हा हे म्हातारं ‘खोड’सुद्धा नसेल.. चूक की बरोबर ठरवायला तोवर जगा नि जगू द्या.’ सून निरुत्तर होती. हतबल होती. नाइलाजाने गप्प होती.