राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी फटाके मुक्त दिवाळी साजरी झाली पाहिजे. फटाके बंदीबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशा बाता मारणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम सपशेल तोंडावर पडले आहेत.
मुंबई- राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी फटाके मुक्त दिवाळी साजरी झाली पाहिजे. फटाके बंदीबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशा बाता मारणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम सपशेल तोंडावर पडले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फटाके बंदीला कडाडून विरोध करताच कदम यांनी लगेच घुमजावे केले आहे.
फटाके बंदीचे सूतोवाच काल रामदास कदम यांनी करताच समाजाच्या विविध स्थरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तरीही रामदास कदम फटाके बंदीवर ठाम होते. मात्र आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कानपिचक्या देताच कदम यांची भूमिका बदलली. ते म्हणाले की, संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी चिंता करु नये, हिंदूंच्या सणाची काळजी या रामदास कदमला आहे, बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असे कदम प्रसार माध्यामांशी बालताना म्हणले.
महाराष्ट्रात फटाकेबंदीबाबत मी विचाराधीन आहे असे बोललोच नाही, अशी सपशेल पलटी कदम यांनी मारली. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदूंच्या सणावर निबर्ंध येणार नाही आणि हे पाप शिवसेना आणि मी करणार नाही. त्यामुळे फटाकेबंदीबाबत असा निर्णय घेणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.
दिल्लीत फटाकेबंदी झालीच नाही, व्यापारी भागात फक्त फटाके विक्री करू नका, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे ज्यांनी काल प्रतिक्रिया दिल्या त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, फक्त प्रसिद्धीसाठी बोलायचे नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी संजय राऊत आणि राज ठाकरेंना चिमटा काढला.