बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर सीबीआय न्यायालय बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावणार आहे.
नवी दिल्ली- बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर सीबीआय न्यायालय बाबा गुरमीत राम रहीमला सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. बाबा राम रहीमला कमीत कमी सात वर्षांची आणि जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राम रहीमवर बलात्कारचा आरोप सिद्ध झाला आहे. राम रहीलमा किती वर्षांची शिक्षा होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
बलात्काराचे हे प्रकरण २००२ सालातील आहे. त्यामुळे दिल्लीतील २०१३ सालच्या बलात्कार प्रकरणानंतर कडक करण्यात आलेल्या कायद्यानुसार राम रहीमला शिक्षा सुनावली जाणार नाही. मात्र, पीडितेवर धर्मगुरुकडून अत्याचार आणि २ महिलांवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालय १० वर्षापर्यंत शिक्षा देऊ शकते. याशिवाय कलम ५०६ साठीही सात वर्षापर्यंत शिक्षा सुनावली जाऊ शकते.
न्यायाधीशच जाणार जेलमध्ये
न्यायाधीश रोहतक जेलमध्ये जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार आहेत. जेलमधील या न्यायालयाला सत्र न्यायालयाचा दर्जा असल्याने राम रहीमला उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देता येईल. निर्णयाची प्रत लगेचच राम रहीमच्या वकिलाकडे दिली जाईल. यानंतर राम रहीमचे वकील उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करू शकतात.
दरम्यान, जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणे कठीण मानले जात आहे. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी उच्च न्यायालय सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवले जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.
हिंसाचारानंतर हरियाणा सरकार खडबडून जागे
बाबा राम रहीमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर हरियाणामध्ये राम रहीमच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणात हिंसाचार केला. त्यामुळे हरियाणा सरकारने उद्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी सेनेच्या २८ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणच्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
अजित डोभाल यांची वरिष्ठ अधिका-यांशी बैठक
हरियाणातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा केला आहे.