पत्रकारिता कालही तशीच होती, आजही तशीच आहे आणि उद्याही आहे तशीच राहणार. परंतु, आत्ताचा पत्रकार हा त्याच जुन्या पत्रकारितेला धरून राहणार नाही.
ठाणे- पत्रकारिता कालही तशीच होती, आजही तशीच आहे आणि उद्याही आहे तशीच राहणार. परंतु, आत्ताचा पत्रकार हा त्याच जुन्या पत्रकारितेला धरून राहणार नाही. त्याने स्वत:ला काळानुसार बदलत ठेवत आधुनिक प्रयोग पत्रकारितेत आणले पाहिजेत. उद्या येणारी पत्रकारिता ही डिजिटलच्या देखील पुढची असेल जी ख-या अर्थाने क्रांती घडवणारी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी केले.
ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडकर जन्मशताब्दीनिमित्त स्मृती व्याख्यानमालेत ‘पत्रकारिता: काल, आज आणि उद्या’ विषय निश्चित करण्यात आला होता. त्यावेळी अकरावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. परुळेकर म्हणाले, तुमच्याकडे नम्रपणा असायला हवा, कौशल्य असायला हवे. परंतु, मिळालेल्या ज्ञानाचा कधीच अहंकार नसावा. मी सूर्य विकणारा माणूस आहे. भाकरीसाठी चंद्र विकणारा माणूस नाही, असे सांगून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली.
महाराष्ट्राला पत्रकारितेची एक वेगळी अस्मिता आहे. अनेक नामवंत पत्रकार हे या महाराष्ट्राच्या संस्कृतीतून घडले. आज सुप्त पत्रकारिता ही कुठेतरी हरवत चाललेली आहे. तेव्हा समाजभान राखून केलेली पत्रकारिता ही ख-या अर्थाने समाजाला न्याय मिळवून देणारी ठरेल, असा सुयोग्य विचार महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. महाविद्यालयातील संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश पाटील यांच्या उत्कृष्ट आयोजनाची साथही कार्यक्रमास लाभली.
यावेळी पत्रकारिता विभागाच्या प्रा. विमुक्ता राजे तसेच मराठी विभागाचे प्रा. संतोष राणे हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत धर्माधिकारी यांनी केले. या व्याख्यानाचे विद्या प्रसारक मंडळाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण सुरू होते. प्रा. नेहा मालखरे यांनी पसायदान सादर करून व्याख्यानमालेच्या अकराव्या पुष्पाची सांगता केली.
[EPSB]
[/EPSB]