२६ जुलै २००५च्या प्रलयकारी पावसाची आठवण करून देणारा पाऊस मंगळवारी मुंबईत बरसल्यानंतर सर्वाधिक नुकसान दुकानदारांचे झाले.
मुंबई- २६ जुलै २००५च्या प्रलयकारी पावसाची आठवण करून देणारा पाऊस मंगळवारी मुंबईत बरसल्यानंतर सर्वाधिक नुकसान दुकानदारांचे झाले. सुमारे ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यापारी संघटना व्यक्त करत आहेत.
या संदर्भात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन (एफआरटीडब्ल्यूए) या व्यापा-यांच्या मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी सांगितले की, पावसामुळे व्यापा-यांचे तब्बल २५० ते ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईतील हिंदमाता, परळ या सखल भागांत चार ते सहा फूट पाणी साचल्यामुळे येथील पारंपरिक कापड बाजाराचे खूप नुकसान झाले. घाऊक धान्य, कापड व इलेक्ट्रॉनिक बाजार येथे पाण्याचे साम्राज्य असल्यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले.
वीरेन शहा यांनी हवामान खात्यावरही टीका केली. ते म्हणाले, हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाचाही फटका व्यापा-यांना बसला. बुधवारसाठी दिलेला पावसाचा अंदाज सपशेल चुकीचा ठरला. मुंबईसारख्या दंतूर किनारा असलेल्या नैसर्गिक बंदराला वादळाचा तडाखा बसू शकत नसतानाही, मोठय़ा प्रमाणावर वादळाचा तडाखा बसणार आहे, असे वृत्त पसरल्यामुळे या गोंधळात अधिकच भर पडली. या पावसामुळे कापड बाजार, धान्य बाजार व रेस्तराँ यांचे सर्वाधिक नुकसान झाले.
मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या हानीतून सावरण्याचा दुकानदारांनी बुधवारी प्रयत्न केला. बुधवारी कार्यालये, शाळा व कॉलेज यांना सुट्टी जाहीर झाल्यामुळे ग्राहक दुकानांकडे फिरकले नाहीत. त्यामुळे विक्री झालीच नाही. त्यामुळे या हानीत भर पडली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी मुसळधार पाऊस पडला. परंतु बुधवारीही मुसळधार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज पूर्णत: खोटा ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हवामान खात्याकडे असलेले तंत्रज्ञान जुनाट आहे. लंडनसारख्या शहरात दर दोन तासांचा हवामानविषयक अंदाज अचूक ठरतो, मात्र देशात हवामान खात्याचा अंदाज अभावानेच खरा ठरतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.