खासदारांचा पगार १०० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या ढळढळीत विसंगतीवर राजधानीत सर्व बाजूंनी टीका होत आहे.
नवी दिल्ली- एकीकडे ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेत सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात केली जात असताना त्या असंतोषातून आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबीयाला सांत्वनासाठी भेटायला जाणा-या राहुल गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्योतिरादित्य शिंदे, मनीष सिसोदिया यांना सरकार अटक करत असतानाच खासदारांचा पगार १०० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या ढळढळीत विसंगतीवर राजधानीत सर्व बाजूंनी टीका होत आहे.
सध्या खासदारांना ५० हजार (मूळ पगार) असून, तो आता १ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी देशासाठी लढणा-या सैनिकांना निवृत्तीनंतर देण्यात येणा-या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याने माजी सैनिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. त्याच तणावातून रामकृष्ण ग्रेवाल यांनी आपली जीवनयात्रा आत्महत्या करून संपावली असताना त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वनासाठी जाणा-यांना मोदी सरकारने अटकाव करण्याची भूमिका घेतल्यानेही देशभर संताप व्यक्त होत आहे.
‘एक पद, एक पेन्शन’ (ओआरओपी) च्या मुद्दय़ावरून हरियाणातील माजी सैनिक रामकृष्ण ग्रेवाल यांनी मंगळवारी आत्महत्या केली. ग्रेवाल यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेले कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
राहुल गांधी यांची ४ वाजता सुटका केली, मात्र त्यांना पुन्हा सायंकाळी ६ वाजता स्थानबद्ध करून नंतर रात्री सोडण्यात आले. रामकृष्ण ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी गांधी येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात जात होते. मात्र पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले.
माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रोखल्याबद्दल केजरीवाल म्हणाले की, मोदी सरकार ‘गुंडागिरी’वर उतरले आहे. मोदी सरकार लष्कराचे राजकीयीकरण करत आहे. ‘एक पद-एक पेन्शन’च्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध करून मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेले. तेथे ७० मिनीटांनी त्यांची सुटका करण्यात आली.
सायंकाळी ६ वाजता दिल्ली पोलिसांनी पुन्हा गांधी यांना स्थानबद्ध केले. त्यानंतर गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, अजय माकन यांना पोलीस व्हॅनमधून नेले. राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हालचालींवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारची मानसिकता ‘लोकशाहीविरोधी’ असून ‘वन रॅँक, वन पेन्शन’ बाबत सरकार खोटे बोलत आहेत. माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना स्थानबद्ध करताना तुम्हाला अटक करताना लाज वाटत नाही का? अशी प्रश्नांची सरबत्ती गांधी यांनी मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यावर केली. शहीदांच्या कुटुंबियांना अटक केली जाते. हाच मोदींचा भारत आहे. तुम्ही शहीदांच्या मुलगा व वडिलांना कशी अटक करू शकता ?
ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना भेटू द्यावे, अशी मागणी कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस अधिका-याने राहुल गांधी यांना कुटुंबाला भेटू देण्यास नकार दिला. आता भारतात काय चालले आहे ? असे तुम्ही लक्षात घ्या. राजकीय विरोधकांना ताब्यात घ्या, असे गांधी यांनी पत्रकारांना सांगितले.